मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा : सर्वांनी घरांवर तिरंगा फडकविण्याचे आवाहन
प्रतिनिधी /पणजी
कुशल मनुष्यबळ निर्मिती करण्यासाठी आयडीसी-आयटीआय यांच्यात 15 जुलै रोजी करार करून 42 कोर्स सुरू होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत बोलताना केली. ‘आझादी का अमृत महोत्सव’ गोव्यातही वर्षभर साजरा करण्यात येणार असून सर्वानी घरावर तिरंगा फडकवावा, असे आवाहन त्यांनी केले.
पावसाळय़ानंतर पुन्हा एकदा ‘सरकार तुमच्या घरी’ व स्वयंपूर्ण गोवा’ मोहीम सुरु केली जाणार असल्याचे ते म्हणाले.
टीका करा, प्रतिमा खराब करु नका
खाण लिजांचा लिलाव येत्या 6 महिन्यात करण्यात येणार असून त्यासाठी एसबीआयकडे सरकार समन्वय करणार आहे. कल्याणकारी योजनांचे पैसे खात्यात जमा होण्यापूर्वी एसएमएस पाठवण्याची पद्धत येत्या 3 महिन्यात सुरू होणार आहे. सरकारवर टीका करा, परंतु सरकारची प्रतिमा मात्र खराब करू नका, असे आवाहन डॉ. सावंत यांनी केले.
स्वयंपूर्ण मित्रांचे अभिनंदन
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत बोलताना डॉ. सावंत पुढे म्हणाले की गोव्यात डबल इंजिन सरकार पुन्हा एकदा जनतेने दिले असून ते अंत्योदय तत्वावर चालत आहे. स्वयंपूर्ण मित्र दर शनिवारी पंचायतीत असतात व स्वयंपूर्ण गोव्याची मोहीम ते चालवत आहेत. त्याला जुमला म्हणू नका तर त्यासाठी प्रोत्साहन द्या म्हणजे ते आणखी चांगली कामे करतील, असे सांगून डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वयंपूर्ण मित्रांचे अभिनंदन केले.
अभिभाषण म्हणजे फक्त थापा : सरदेसाई
तत्पूर्वी विजय सरदेसाई यांनी चर्चेत भाग घेताना राज्यपालांचे अभिभाषण म्हणजे फक्त थापा असल्याची टीका केली आणि त्याबाबत खुलासा केला. डॉ. सावंत हे ‘भिवपाची गरज ना’ असे म्हणत होते, परंतु सरकार, राज्यपालांच्या अभिभाषणातून कशा थापा मारते हे ‘जनतेक कळपाची गरज असा’ अशी टीपणी सरदेसाई यांनी केली.
खाणी लवकर सुरू करा : लोबो
आमदार मायकल लोबो यांनी राज्यपालांचे भाषण व सरकारच्या विरोधात बोलताना सांगितले की कोरोना काळात धंदे, व्यवसाय बंद झाले म्हणून सावंत सरकारने प्रत्येकी रु. 5000 देण्याची घोषणा केली होती तसेच 10000 नोकऱयांची घोषणा केली होती. त्याचा अजून पत्ता नाही. गोव्यात येणाऱया म्हादई नदीचे पाणी कर्नाटकाने पळवले आणि वळवले तरी गोवा सरकारला त्याचा पत्ता नाही. तेथे शिष्टमंडळ पाठवून काय घडले आहे त्याची पाहणी करा, असे लोबो यांनी सुचवले. खाणींचा प्रश्न तसाच लोंबकळत पडला असून त्या लवकरात लवकर सुरू करा, अशी मागणी लोबो यांनी केली.
अनेक गावात लोकांना पाणी मिळत नाही तर वीज गायब असते आणि या दोन्ही सेवा 24 तास देण्याच्या घोषणा विनाकारण करण्यात येतात याकडे लोबो यांनी लक्ष वेधले. विरोधी आमदारांनी उपस्थित केलेल्या विविध विषयांना डॉ. सावंत यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला आणि काही राहिले असेल तर मागण्यांवरील चर्चेत बोलतो असे सांगितले.