बेळगाव तालुक्याच्या काही गावांमध्ये जपली जातेय परंपरा : एकात्मता टिकून राहण्यास मदत : वाढत्या महागाईत संकल्पना महत्त्वाची : खर्चावर नियंत्रण : तरुण वर्ग संघटित
वार्ताहर /किणये
गणेशोत्सव हा आनंदाच्या पर्वणीचा सण. भावभक्तीचा गजर व मनोरंजनाच्या माध्यमातून सर्वांना अकरा दिवस निखळ आनंद देणारा उत्सव म्हणून गणेशोत्सवाकडे पाहिले जाते. अलीकडे सार्वजनिक मंडळांची संख्या वाढत असल्याने भाविकसुद्धा विभागले जात आहेत. यामुळे खर्चही वाढत आहे. ग्रामीण भागात एकोपा टिकून राखण्यासाठी ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना अधिक रुजविणे गरजेचे आहे. लोकांना संघटित करता यावे हाच गणेशोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. बेळगुंदी, जानेवाडी, इनाम बडस, बोकनूर, येळेबैल, चलवेनट्टी, गुंजेनहट्टी, जाफरवाडी, बेन्नाळी, अवचारहट्टी, बंबरगा, बाळगमट्टी, हंदिगनूर, गौंडवाड या गावांमध्ये आजही ‘एक गाव एक गणपती’ परंपरा टिकून आहे. ही संकल्पना रुजविणारी गावे आदर्शवत ठरत आहेत.
जानेवाडी येथे 39 वर्षांची परंपरा
जानेवाडी येथे 39 वर्षांपासून ‘एक गाव एक गणपती’ची परंपरा अखंड सुरू आहे. यामुळे नागरिकांच्या उत्साहात भर पडत आहे. ग्रामस्थांनी 39 वर्षांपूर्वी समाज मंदिरात बैठक घेऊन गणेशोत्सव सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सार्वजनिक गणेश मूर्तीची प्रति÷ापना केली. यावेळी गावात एकच सार्वजनिक मूर्ती पुजण्याचा संकल्प करण्यात आला
काळू गुरव, मधु गुरव, नेमानी पावशे, गुंडू होणगेकर, रामचंद्र गोजेकर, मोनाप्पा पावशे, काळू पावशे आदींच्या सहकार्याने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. गावातील पंचमंडळी व पुन्हाप्पा गोजेकर गुरुजी यांचेही त्यांना मार्गदर्शन लाभले. गावात दोन गल्ल्या आहेत. या गल्ल्यांमधील नागरिक गुण्यागोविंदाने गणेशोत्सव साजरा करतात. हीच परंपरा कायम ठेवली आहे. गावातील प्रत्येक कुटुंबाकडून सुरुवातीला 50 पैसे तर कामगार वर्गाकडून एक-दोन रुपये अशी वर्गणी जमा करून गणेशोत्सव साजरा करतात अशी माहिती काळू गुरव यांनी दिली. सध्या या मंडळासाठी सुमारे 50 ते 60 कार्यकर्ते एकत्रितपणे कार्य करताना दिसत आहेत.
बहाद्दरवाडीत 47 वर्षांपासूनची परंपरा
बहाद्दरवाडीत 47 वर्षापासून परंपरा सुरू आहे. येथे 1974 साली सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. बी. एन. तोराळकर, बी. एम. पाटील, भागांना पाटील, कृष्णा पाटील आदींच्या पुढाकारातून ब्रह्मलिंग युवक मंडळाची स्थापना केली. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गावात गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेऊन ब्रह्मलिंग मंदिरात गणेश मूर्तीची स्थापना करून उत्सवाला सुरुवात केली. 1994 साली ब्रह्मलिंग युवक मंडळाची पुनर्रचना केली. अध्यक्षपदी मल्लाप्पा विष्णू पाटील यांची सर्वानुमते निवड केली. गेल्या 27 वर्षापासून आजही या मंडळाचे अध्यक्ष व इतर पदाधिकारी कार्यरत आहेत. ‘एक गाव एक गणपती’ असल्यामुळे रोज महाआरतीला गावात मोठय़ा प्रमाणात गर्दी होते. विविध मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करतात या गावानेही डॉल्बीला फाटा दिला असून मिरवणूक टाळ मृदंगाच्या गजरातच काढली जाते.
इनाम बडस येथे ‘एक गाव एक गणपती’
इनाम बडस गावातही गेल्या 25 वर्षांपासून ‘एक गाव एक गणपती’ साजरा करण्यात येतो. गावातील लक्ष्मी मंदिराच्या बाजूला मंडप उभारण्यात आला असून या मंडपात गणरायाच्या मूर्तीची प्रति÷ापना केली आहे. सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त रोज महाआरती व पूजा विधी कार्यक्रम करण्यात येतात. गावातील सर्व महिला व ग्रामस्थ एकत्रित येऊन हा उत्सव साजरा करतात. सध्या नागो कांशिडे हे अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळतात तर उपाध्यक्ष म्हणून प्रकाश सुतार
आहेत.
बाळगमट्टीत 40 वर्षांपासून गणेशोत्सव साजरा
बाळगमट्टी गावात साजरा करण्यात येणारा गणेशोत्सव हा गावकऱयांसाठी आनंदाची पर्वणी ठरणारा असाच आहे. नावगे गावच्या डोंगर पायथ्याशी शिवाराने बहरलेल्या निसर्गरम्य परिसरात बाळगमट्टी गाव आहे. या गावातही 40 वर्षापासून ‘एक गाव एक गणपती’ची परंपरा अखंडपणे सुरू आहे. गणेशोत्सवाचे सर्व कार्यक्रम लहानापासून थोरा मोठय़ापर्यंत एकत्र येऊन करतात. सुमारे 200 हून अधिक कार्यकर्ते या गणेशोत्सवासाठी कार्य करीत असतात. वडीलधारी मंडळी त्यांना मार्गदर्शन करतात.
बेळगुंदीत 95 वर्षापासूनची परंपरा
बेळगुंदी येथे 95 वर्षापासूनची परंपरा. येथे 1927 साली सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात करण्यात आली. ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना गेल्या 94 वर्षांपासून या गावाने जपली असून यंदाचे हे 95 वे वर्ष असल्यामुळे गावात एक वेगळेच वातावरण निर्माण झाले आहे. गावात 15 ते 16 युवक मंडळे आहेत. तरीही ‘एक गाव एक गणपती’ची परंपरा जपली असल्याने त्यांचा हा समाजहिताचा उपक्रम कौतुकास पात्र ठरत आहे. गावात एकोपा राहावा हा उद्देश ठेवून वडीलधारी मंडळींनी एकच गणपती पुजण्याचा निर्धार केला. त्यानुसार आजही ही परंपरा जपली जात आहे. गेल्या अनेक वर्षापासून बेळगुंदी गावात डॉल्बीला फाटा दिला आहे. गणपतीची मिरवणूक केवळ टाळ मृदंग आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरातच काढली जाते. सर्वजण एकत्र यावेत आणि सार्वजनिक गणेशोत्सव टिकून राहावा यासाठी कार्यकारी मंडळाची निवड प्रत्येक पाच वर्षाला एकदा करण्यात येते. गेल्या 30 वर्षापासून कार्यकारी मंडळाची निवड करण्याचा निर्णय गावकऱयांनी घेतला आहे. गल्लीतील दोन तरुण कार्यकर्ते या गणेशोत्सव मंडळात घेण्यात येतात सध्या या मंडळात नाथा अमरोळकर, नंदकुमार सुतार प्रदीप बोकमूरकर, रघुनाथ गावडा, रामकृष्ण पाटील, यशवंत पाटील, महादेव बेटगेरीकर, विठ्ठल भडांगे आदी कार्यकारी मंडळ म्हणून कार्यरत आहेत. सर्व व्यवहार गावकऱयांच्या सम्मतीनेच करण्यात येतो. ग्रामस्थ, पंच कमिटी व सर्वजण मिळूनच निर्णय घेतात. कोणावरही वर्गणीची सक्ती नाही. स्वइच्छेने देतील तेवढी वर्गणी स्वीकारण्यात येते.