जि.प.समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे यांचे आवाहन
कोल्हापूर प्रतिनिधी
जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत दिव्यांगाना देण्यात येणारे समाज कल्याण विभागाचे ओळखपत्र 2 ऑक्टोबर 2018 पासून रद्द करून शासनाने वैश्विक ओळखपत्र बंधनकारक केले आहे. तरीही की दिव्यांगांकडे जि.प.समाजकल्याण विभागाच्या बोगस सही,शिक्क्याची ओळखपत्रे पहावयास मिळत आहेत. अशा बोगस ओळखपत्रांचे वाटप सुरु असल्याचे समाजकल्याण विभागाच्या निदर्शनास आले आहे. समाजकल्याणच्या अशा ओळखपत्रासाठी दिव्यांगांची अर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशी बोगस ओळखपत्रे घेऊ नयेत असे आवाहन जि.प.चे समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी केले.
सदरचे ओळखपत्र देण्याचे अधिकार जि.प.च्या समाज कल्याण विभागास नसल्याने या ओळखपत्राचा कोठेही उपयोग होत नाही, याची सर्व दिव्यांगानी नोंद घ्यावी. दिव्यांगाचे ओळखपत्र देण्यासाठी कोणी आर्थिक मागणी केली असल्यास त्यांना पोलीस विभागात तक्रार करून पकडून द्यावे. जेणेकरून दिव्यांगाची आर्थिक फसवणूक होणार नाही, असे आवाहन घाटे यांनी केले आहे.