राजा चित्रफलकावर बरेच काही चितारू इच्छितो. पण सर्वात महत्त्वाचे एक लेणे त्याचे चितारायचे असते. त्या चित्रात शकुंतला आपले सुंदर तळहात तोंडापुढे धरून घाबरल्यासारखी उभे असते. तोच एक भुंगा विदूषकाला तिच्या तोंडावर झडप घालताना दिसतो. तेव्हा काव्यातून राजा भुंग्याला तिथून जाण्याची विनंती करते. राजा आणि विदूषक दोघेही त्या चित्रात इतके गुंतून जातात की, ते चित्र आहे, वास्तव नाही हे लक्षात यायला दोघांना बराच वेळ लागतो. पण ते चित्र आहे याची जाणीव अखेर विदूषक त्याला करून देतो, तेव्हा तो भानावर येतो. सानुमतीही त्या चित्रात गुंतून गेलेली असते, इतके ते जिवंत वाटते. मग राजाने ती स्थिती जेव्हा प्रत्यक्ष अनुभवली असेल, तेव्हा त्याला काय वाटले असेल हे ती समजू शकते. राजाला मात्र ते चित्र आहे ह्याची जाणीव झाल्यावर खूप दुःख होते.डोळय़ांतून अश्रू वाहू लागतात. तेव्हा सानुमतीला आधीची आणि आताची राजाची स्थिती पाहून त्यात काहीच ताळमेळ दिसत नाही. तिला त्याचे आश्चर्य वाटते. म्हणूनच राजाने शकुंतलेला दिलेल्या दुःखाचे आता खरे परिमार्जन झाले असे वाटते. तेवढय़ात पडद्यातून येणारी चतुरिका मंचावर आपल्याला प्रवेश करताना दिसते.
चतुरिका राजाला सांगते की, वाटेत वसुमतीराणीसाहेबांनी रंगपेटी आपल्या हातून हिसकावून घेतली आणि स्वतःच आणून देणार होत्या. पण त्यांचा पदर एका फांदीत अडकला. तरलिका तो सोडवत असताना ती तिथून सटकली आणि राजाकडे आली. वसुमती तिथे येतेय हे समजल्यावर हातातली तसबीर तो विदूषकाच्या हातात सांभाळायला देतो. ती घेऊन तो मेघप्रतिच्छंद राजवाडय़ात जातो. राजाचे काम झाल्यावर त्याने तिथे हाक मारावी असे सांगत निघून जातो. राजाचे वागणे पाहून ह्याचे वसुमतीवर तितके उत्कट प्रेम नाही, हे सानुमतीला समजते. तेवढय़ात हातात पत्र घेऊन प्रतीहारी वेत्रवती प्रवेश करते. तिच्या हातातील पत्र पाहून इकडे येणाऱया राणीसाहेब परत फिरल्याचे वेत्रवती सांगते. पत्र वाचल्यावर राजाला समजते की, ‘जलमार्गाने व्यापार करणारा धनमित्र नावाचा व्यापारी गलबत बुडून मेला’. त्याची संतती नसल्याने त्याची सारी जायदाद सरकारी मालकीची होते, असे अमात्य त्याला सांगतो. पण राजा सह्रदयतेने अमात्याला म्हणतो की, ‘तो श्रीमंत व्यापारी असल्याने त्याला अनेक बायका असणार. त्यातली एखादी गर्भवती नाही ना याची चौकशी करावी’.
त्याप्रमाणे चौकशी केली असता त्याच्या बायकोचा ‘पुंसवन’ विधी नुकताच झाल्याचे सांगतो.