प्रशासनाच्या खांद्यावरच नियोजनाचे ओझे नको : महाव्दारवरील मिरवणुकीत गर्दी कमी करण्यासाठी राजकारण्यांनीही पुढे यावे
कोल्हापूर / संतोष पाटील
कोल्हापुरात अत्यंत दाटीवाटीच्या आणि चिंचोळ्या महाव्दार रोडवर काही तासात साडेतीनशेहून अधिक सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्ती येतात. एकाचवेळी लाखो गणेश भक्त या अत्यंत अरुंद रस्त्यावर असतात. साउंडसिस्टीमच्या ठेक्यावर बेभान होवून नाचणारी तरुणाई आणि आजूबाजूला अक्षरशः एका पायावर उभे असलेले कोल्हापूरकर हे येथील चित्र भयावह आहे. तब्बल 19 धोकादायक इमारती मिरवणूक मार्गावर आहेत. या पार्श्वभूमीवर मांढरदेवीसारखी चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडू शकते. गणेश उत्सवात वाढलेली प्रचंड गर्दी आणि त्याचा भार सोसण्याची रस्त्यांची क्षमात पाहून पर्यायी मार्गांचा स्वीकारावा. प्रशासनाच्या खांद्यावर नियोजनाचे ओझे ठेवून राज्यकर्त्यांनी नामानिराळे न राहता मिरवणुकीतील पर्यायी मार्गांवरुन मंडळ आणि भाविकांना येण्यासाठी प्रवृत्त क करण्याची गरज आहे.
शंभरवर्षे जुना मिरवणूक मार्ग
कोल्हापुरातील विसर्जन मिरवणुकीत बिनखांबी गणेश मंदिर ते पापाची तिकटी हा मार्ग अत्यंत चिंचोळा आहे. या परिसरात मिरवणूक पाहण्यासाठी अनंतचतुर्थी दिवशी काही तासांसाठी लाखभर भाविक येतात. कानाचे पडदे फाडणारा आणि हृदयाचा ठोका चुकवणारा दणदणाट. त्यावर बेभाम होवून नाचणारी तरुणाई असे धडकी भरवणारे चित्र असते. प्रचंड गोंगाटाच्या वातावरणात एखादी अफवा अथवा लहानसहान अपघातावरुनही पळापळ आणि चेंगराचेंगरी होणार नाही याची खात्री कोणीही देवू शकत नाही. मिरवणुकीत 2010 साली महाव्दार रोडवर इमारतीची गॅलरी कोसळल्याची आठवण आजही ताजी आहे. मागील काही दशकात कोल्हापूरची लोकसंख्या तिप्पट झाली. शहराची सुमारे सहा लाख लोकसंख्या आणि आजूबाजूच्या गावातून सुमारे दोन लाखाहून अधिक भाविक शहरात येतात. हजारोंच्या संख्येने वाहने रस्त्यावर असतात. गर्दीच्या नियोजन आणि सुरक्षेच्यादृष्टीने महाव्दार हा मुख्य मिरवणुकीचा मार्ग असूच शकत नाही, हे पोलीस प्रशासनासह सुरक्षा यंत्रणांचे म्हणणे आहे. शंभर वर्षापूर्वीचे पारंपरिक मार्ग आताची गर्दी आणि भार सोसू शकत नाहीत. प्रशासनाने निवडलेले पर्यायी मार्ग प्रशस्त आणि सुरक्षित आहेत. आज ना उद्या या पर्यायांचा विचार गणेश मंडळांना करावाच लागेल. याची सुरूवात यंदाच्या वर्षीपासून व्हावी.
भक्त आणि मंडळांची सोय तसेच प्रशासनावरील अतिरिक्त ताण कमी करणारे असेच पर्यायी मार्ग आहेत. पर्यायी मार्गांचा अवलंब केल्याने 28 ते 30 तास रेंगाळणारी मिरवणूक कमी कालावधी पूर्ण होईल. प्रशस्त रस्त्यांमुळे मंडळांना अधिक चांगल्या देखाव्यांचे सादरीकरण करणे शक्य होणार आहे. त्यामुळे बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वाररोड, पापाची तिकटी, गंगावेश, रंकाळा टॉवरमार्गे इराणी खण या पारंपारिक मार्गावरील गर्दी कमी करण्याची गरज आहे. सावित्रीबाई हॉस्पिटल, मंडलिक वसाहत चौक, हॉकी स्टेडियम, इंदिरासागर चौक, संभाजीनगर, देवकर पाणंदमार्गे इराणी खण आणि दुसरा मार्ग उमा टॉकीज चौक, बिंदू चौक, पापाची तिकटी, गंगावेश, रंकाळा टॉवरमार्गे इराणी खण या पर्यायी मिरवणूक मार्गांचा अधिकाधिक मंडळांनी वापर करण्याची गरज आहे.
चांगल्यासाठीही पुढे या
मतांवर डोळा ठेवून राजकारण करण्याची पध्दत रुढ होवू पहात आहे. प्रशासनाने प्रसंगी रोष पत्करुन एखादे जोखमीचे काम केल्यावर त्याचे श्रेय घेण्याची स्पर्धा राजकारण्यांत लागल्याचे वास्तव आहे. प्रशासन आणि राजकारण ही दोन समाजस्वास्थ जपणारी चाके आहेत. प्रशासन चुकत असेल तर राज्यकर्त्यांनी कान पकडावेत. मात्र मोठय़ा संख्येने असलेल्या लोकांचे हित लक्षात घेवून होणाऱया बदलासाठी प्रसंगी काहींचा रोष पत्करुन, नव्या बदलासाठी राज्यकर्त्यांनी पुढे येण्याची गरज आहे.
काय आहे मांढरदेवी दुर्घटना
सातारा जिह्यात सह्याद्री पर्वतरांगेत उंच डोंगरावर मांढरदेव येथे काळूबाई देवीचे मंदिर आहे. पौष पोर्णिमेला देवीची मोठी यात्रा भरते. या काळात लाखो भाविक ढोल आणि झांज वाजवत देवीचे देव्हारे घेवून गडावर येतात. भाविक गडावर चुली पेटवून देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. सेवकांना मासांहारी नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. पौष पोर्णिमेच्या मध्यरात्री देवीचा मुखवटा पालखीत बसवून हजारो वाद्यांच्या गजरात देवीचा छबिना काढला जातो. हे यात्रेचे मुख्य आकर्षण असते. मात्र, 25 जानेवारी 2005 रोजी मांढरदेवी येथील काळुबाई देवीच्या यात्रेत चेंगराचेंगरी होऊन 291 भाविक मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना घडली. शेकडो भक्त जखमी झाले. यावेळी संपूर्ण परिसर गर्दीने भरला होता. जोरजोरात वाजणारा हालगी आणि ताशांचा गजर आणि त्या एका विशिष्ट तालावर अंगात काढून घुमणाऱया बायका हे वेगळच दृश्य होते. तिथच नवस फेडण्यासाठी आणलेल्या बकऱयांच्या कत्तली. रक्ताचे वाहणारे पाट, नारळाच्या शेंडीचा ढिग आणि परतीच्या मार्गावर फोडलेल्या नारळाचे पाणी वहात असल्यामुळे झालेली घसरण हीच 291 जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात. यावेळी पांगलेली गर्दी आजूबाजूच्या दुकानात घूसली त्यामुळे पत्र्याची दुकाने कोलमडून पडली. त्याच दुकानांमध्ये शार्टसर्किटने शॉक बसून अनेकांचा जीव गेला. मंदीर परिसरातील दुकानाना आगी लागल्या. काही हॉटेल्स आणि टपऱयांवरील सिलेंडरचे स्फोट झाले. दुर्घटनेनंतर पुढील काळात मांढरदेवी यात्रेची नियमावली ठरली. परिसरातील अतिक्रमण निघाली. अवैध वाहतुकीला चाप लावण्यात आला. गर्दीच्या नियोजनासह गाडय़ांचे पार्कींग आणि भाविकांची एकाचवेळी गर्दी होणार नाही याची दक्षता घेतली गेली. धार्मिक भावनांना बंधने घालण्यात आली. यात्राकाळात पशुपक्षी हत्याबंदी आणि दारूबंदी करण्यात आली, असून त्याची भरारी पथकाकडून तपासणी केली जाते. पण हा बदल घडण्यासाठी 293 भक्तांना जीव गमवावा लागले हे दुर्दैवी आहे.