कुडाळ / प्रतिनिधी
If the inter-district transfer teachers are released from work, there will be a strong movement!
आंतरजिल्हा बदली शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात येऊ नये.जो पर्यंत रिक्त जागांवर स्थानिकांना प्राधान्याने नियुक्त करण्यात येत नाही. तोपर्यंत आंतरजिल्हा बदली शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात येऊ नये. त्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्यास आमचा तीव्र विरोध असून कार्यमुक्त प्रक्रियेला तात्काळ स्थगिती देण्यात यावी. अन्यथा युवासेनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा बुधवारी सिंधगुर्ग जिल्हा युवासेनेने जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी व प्राथमिक शिक्षणाधिकारी याना निवेदनाद्वारे दिला आहे.भरती प्रक्रियेत स्थानिकांना डावलल्यास आम्ही भरती प्रक्रिया बंद पाडू. शासनाने दडपशाही चा वापर करून नियुक्त्या दिल्यास उमेदवार रुजू होणारी शाळा बंद पाडू ,असा इशाराही दिला आहे. या निवेदनावर युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, युवासेना कुडाळ तालुका प्रमुख योगेश धुरी,तालुका समन्वयक योगेश तावडे तालुका चिटणीस तानाजी पालव ,कुडाळ युवासेना शहरप्रमुख संदीप म्हाडेश्वर व शहर समन्वयक अमित राणे यांच्या सह्या आहेत.योगेश धुरी व युवासेना पदाधिकारी शुभम शिंदीकर यांनी निवेदन सादर केले. योगेश तावडे ,संदीप म्हाडेश्वर, अमित राणे व राजू गवंडे उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अंतर्गत कार्यान्वित प्राथमिक शिक्षकांना १६ एप्रिल २०२३ ते ३० एप्रिल २०२३ या कालावधीत ३६५ शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात येणार आहे. या रिक्त जागांवर शिक्षक भरती करण्यापूर्वी या शिक्षकांना कार्यमुक्त करणे म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळेमधील विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडण्यासारखे आहे. पवित्र पोर्टल द्वारे शिक्षक भरती करण्यात येणार आहे असे समजते. परंतु अभियोग्यता परीक्षेविरोधात अनेक याचिका दाखल करण्यात येत आहेत. सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात उपशिक्षक ५७६ व पदवीधर २९७ अशा मिळून एकूण ८७३ जागा रिक्त आहेत. त्यात ३६५ शिक्षकांची भर पडणार आहे. सन २००८ व २०१० साली सीइटी व २०१९ साली पवित्र पोर्टल ने भरण्यात आलेल्या शिक्षकांमध्ये ९५ टक्के शिक्षक पर जिल्ह्यातील होते. आंतरजिल्हा बदलीमुळे तीन ते पाच वर्षात शिक्षक आपल्या स्वजिल्ह्यात बदलीस पात्र होऊन निघून जातात जिल्ह्यातील पदे रिक्त होतात. हे चक्र अविरत सुरूच राहते. यामुळे विद्यार्थ्यांबरोबर स्थानिक डीएड पदवीधारकांचे नुकसान होत आहे. सद्यस्थितीत रिक्त पदे व जिल्ह्यातील डीएड पदवीधारकांची संख्या ही जवळपास सारखी आहे. त्यामुळे या रिक्त पदांवर स्थानिक डीएड पदवीधारक यांना नियुक्त्या दिल्यास विद्यार्थी व स्थानिक पदवीधारकांचे नुकसान होणार नाही.
रिक्त जागांवर स्थानिकांची प्राधान्याने नियुक्त करण्यात यावी. सदर शिक्षकांना कार्यमुक्त केल्यास तसेच स्थानिकांना डावलून जिल्ह्याबाहेरील उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली तर आम्ही भरती प्रक्रिया कोणत्याही परिस्थितीत बंद पाडू ,असा इशारा देत ग्रामसेवक, तलाठी, आरोग्यसेवक व अन्य भरतीत स्थानिकांनाच प्राधान्य देण्यात यावे ,अशी मागणी करण्यात आली आहे.