लक्ष्मीकांत देशमुख यांचे प्रतिपादन : शेकोटी संमेलनातील परिसंवाद
सांस्कृतिक प्रतिनिधी /फोंडा
आज देशापुढे, राज्यापुढे व समाजापुढे अनेक यक्षप्रश्न आहेत, जे मानवनिर्मित आहेत. लोकशाही व्यवस्थेमध्ये आपल्याला जसे लोकप्रतिनिधी पाहिजेत, तसे आपण निवडून आणू शकतो. देशाची सर्वभौमता ही कुणा वैयक्तिक घटकावर अवलंबून नसून ती जनतेवर बेतलेली आहे. जनता जागृत असेल तर कुठल्याही यक्षप्रश्नासमोर उतारा शक्य आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले.
कोकण मराठी परिषद, गोवा आयोजित सतराव्या शेकोटी संमेलनात ‘आपल्या यक्ष प्रश्नांना आपण दक्षपणे सामोरे जातोय का ? या विषयावरील परिसंवाद देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाला. केरी फोंडा येथील श्री विजयादुर्गा सभामंडपात भरलेल्या या संमेलनाच्या दुसऱया दिवशी सकाळच्या सत्रात झालेल्या या परिसंवादात पत्रकार सुरेश नाईक, शिक्षणतज्ञ प्रकाश पायगुडे, माजी खासदार ऍड. नरेंद्र सावईकर, अर्थतज्ञ डॉ. बसवेश्वर चेणगे व मच्छिंद्र च्यारी या वक्त्यांचा सहभाग होता.
आपण दक्ष राहिल्यास परिस्थिती नियंत्रणात राहील : सुरेश नाईक
पत्रकार सुरेश नाईक म्हणाले, साहित्य हा विषय जेवढा सुलभ वाटतो, तेवढाच तो क्लिष्ट आणि गुंतागुंतीचा आहे. खाण, पर्यटन आणि पर्यावरण हे तीन महत्त्वाचे विषय असून खाणी जोपर्यंत मर्यादेत चालत होत्या, तोपर्यंत गोव्याच्या समृद्धीचा मार्ग म्हणून त्याकडे बघितले गेले. पर्यटनामध्ये सूसुत्रता राहिलेली नाही. अंमली पदार्थ व इतर विसंगत धोक्यांमुळे पर्यटन पूर्वीप्रमाणे निरामय राहिलेले नाही. पर्यावरणाच्या बाबतीत तर परिस्थिती खूपच बिकट आहे. त्यामुळे आजच्या यक्ष प्रश्नांना आपण दक्षपण सामोरे गेलो तरच परिस्थिती नियंत्रणात राहील.
रोजगाराभिमुख शिक्षण आवश्यक : प्रकाश पायगुडे
शिक्षणतज्ञ प्रकाश पायगुडे म्हणाले, ज्ञानदीप लावण्याची प्रक्रिया म्हणजे शिक्षण असून विविध माध्यमातून, कीर्तन निरुपणाच्या सादरीकरणातून साक्षरता प्रसवते. वार्षिक परीक्षा आणि शाळेच्या वर्गात बसून मिळवलेले शिक्षण आणि व्यवहारी ज्ञानातून आलेली प्रगल्भता ही शिक्षणाचीच वेगवेगळी अंगे आहेत. प्राथमिक पातळीवर दर्जेदार शिक्षण मिळाल्यास शिक्षणाचा पाया भक्कम होईल. इंग्रजी शाळांकडेच बहुतेक पालक आपल्या मुलांना पाठवित असल्याने स्थानिक भाषांमधून शिक्षणाऱया विद्यार्थ्यांची संख्या रोडावत चालली आहे. रोजगाराभिमुख शिक्षण घेणे हेही बेरोजगार सुशिक्षितांच्या समस्येवरील उत्तर आहे, असे त्यांनी नमूद केले.
राजकीय व्यवस्था निर्दोष हवी : ऍड. नरेंद्र सावईकर
ऍड. नरेंद्र सावईकर म्हणाले, राजकारणामध्ये वेगवेगळय़ा समस्या असू शकतात. राजकारणातील घराणेशाही हा एकछत्री अंमलाचा भाग असल्याचे जनतेने अनुभवले आहे. व्यक्तीकेंद्रीय राजकारणामुळेही राजकीय क्षेत्र दिशाहीन झाल्याची इतिहासात उदाहरणे आहेत. चुकीच्या राजकारणाचा नकारात्मक परिणाम अर्थव्यवस्थेवरही झाल्याचे देशवासियांनी पाहिले. राजकारण्यांकडे बघण्याचा जनतेचा दृष्टीकोन बदललेला आहे. त्यामुळे राजकारण्यांनाही परिस्थितीनुरुप वागावे लागेल. परंतु देशाच्या राजकारणामध्ये सुसंगती असावी यासाठी अस्तित्त्वातील राजकीय व्यवस्था निर्दोष हवी.
आर्थिक गुन्हेगारी ही सध्य काळातील मोठी समस्या : डॉ. चेणगे
कोरोनाच्या काळातील आर्थिक समस्येवर मात करण्यासाठी माणुसकी कामी आली. गरीबी, आर्थिक विषमता, बेरोजगारी, व्यसनाधिनता, रोगराई याचा थेट परिणाम अर्थव्यस्थेवर होत असतो. कृषी उद्योग उत्तम चालला, शेती बागायतींना राजाश्रय मिळाला तर आर्थिक कुंचबणा शिल्लक राहत नाही. देशाचा विकासदर घटत चालला आहे. नोटबंदी, पुन्हा पुन्हा बदलले जाणारे भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, चलनात असलेल्या मोठय़ा नोटा याचाही वाईट परिणाम आर्थिक क्षेत्रावर झाला. आर्थिक गुन्हेगारी ही सध्याच्या काळातील मोठी समस्या आहे, असे डॉ. बसवेश्वर चेणगे यांनी नमूद केले.
माणसाच्या जडणघडणीत निसर्गाचा सहभाग : मच्छिंद्र च्यारी
मच्छिंद्र च्यारी म्हणाले, संस्काराचे संबंध थेट आपल्याशी आहेत. ‘भाव तैसा प्रभाव तैसा स्वभाव’ ही संस्कृतीची व्याख्या आहे. ती केवळ मानवी बुद्धिमत्तेतून आलेली नसून निसर्गाचा सहभाग आपल्या जडण घडणीत मोठय़ाप्रमाणात आहे. संस्कृती जपली तर शरीर व्यवस्थाही सांभाळली जाईल. निसर्गाने पिंड जगविण्यासाठी माणसापुढे जी जी आव्हाने ठेवली ती विचारपूर्वक आणि दिव्य दृष्टीतून पेलली तर संस्कारक्षम जीवनाचा आनंद आणि समाधान प्राप्त करुन घेणे शक्य आहे.
शेवटी प्रत्येक क्षेत्रामध्ये समस्या आहेत. परंतु त्या सोडविण्यासाठी आपण सजग राहिले पाहिजे असा या परिसंवादाचा एकंदरीत सूर होता. लक्ष्मीकांत देशमुख यांनी स्वागत तर प्रा. नारायण महाले यांनी आभार मानले.