भगवंत म्हणाले, ब्रह्मदेवाने संसार उत्पन्न केला निर्माण केलेल्या प्रजेने काय करावे म्हणजे त्यांचा उद्धार होईल हे त्यांच्या लक्षात यावे म्हणून त्याने प्रजेला केलेला उपदेश गीतेतील तिसऱया अध्यायात भगवंतानी सांगितला आहे. तो असा, (यातील यज्ञ म्हणजे नेमून दिलेले कार्य असे समजावे) पूर्वी प्रजेसवे ब्रम्हा यज्ञ निर्मूनि बोलिला । पावा उत्कर्ष यज्ञाने हा तुम्हा काम-धेनु चि ।3.10 । रक्षा देवांस यज्ञाने तुम्हा रक्षोत देव ते । एकमेकास रक्षूनि पावा कल्याण सर्व हि ।3 . 11 । यज्ञ-तुष्ट तुम्हा देव भोग देतील वांछित । त्यांचे त्यांस न देता जो खाय तो ऐक चोर चि । 3.12 । प्रेरिले हे असे चक्र ह्या लोकी जो न चालवी । इंद्रियासक्त तो पापी व्यर्थ जीवन घालवी । 3.16 । ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या शेवटी प्रळय होऊन, देवादिकांसह सर्व सृष्टी नष्ट होते. संसारात काहीच शिल्लक उरत नाही. पण प्रलयात सृष्टीचा निखालस नाश झाला, असे होत नाही कारण नष्ट झालेल्या प्राणीमात्रांचे वासनेचे बीज तसेच शिल्लक उरलेले असते आणि त्याच वासनारूप बीजाने नव्या कल्पाचा आरंभ होतो. उत्पत्तीकाळाच्या वेळी सूक्ष्म वासनारूप बीजांकुरांनी अनेक योनीमध्ये चराचर आणि स्थावर-जंगमात्मक जग वाढते. हे लक्षात घेऊनच संसार अनंत आहे, असे वेदशास्त्रात प्रतिपादन केले आहे पण अशा प्रकारे संसार अनंत असूनही ह्याचा निःशेष नाश ज्याला आत्मज्ञान झाले आहे त्याच्या दृष्टीने होऊ शकतो, असे भगवंत सांगतात. याचाच अर्थ असा की, संसाराची निर्मिती पुनःपुन्हा होत असल्याने तो सगळय़ांच्या साठी नष्ट होत नाही. ज्याला स्वतः पुरता संसार नष्ट व्हावा असे वाटत असेल त्याने आत्मज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करावा. सद्गुरूची पूर्ण कृपादृष्टी झाली की, ब्रह्मज्ञान प्रगट होते. तेच माझे कृपावलोकन होय. ब्रह्मज्ञान पूर्णपणे प्रगट झाले असता संसार झालाच नाही असे होते. फक्त ब्रह्मच ब्रह्मरूपाने पूर्ण स्वरूपाने राहते आणि मीतूपणा उरत नाही, देव, भक्त आणि भजन हा भेद नाहीसा होतो, सगुण मूर्तीचे भान उडून जाते आणि सदासर्वदा सनातन ब्रह्मच काय ते उरते. हे प्रलयाचे लक्षण होय, ते सद्गुरुचरणाचा लाभ झाल्याशिवाय कळणार नाही. अत्यंत प्रलयाची गती सर्वांनाच कळत नाही. कारण की, उद्धवा! ही खरोखर परमनिर्वाणाचीच गती आहे असे खात्रीने समज. आत्मस्वरूपाचा बोध झाल्यामुळेच अत्यंत प्रळयाचा लाभ घडतो. देह पडला की प्रळय झाला हे बोलणे सर्वस्वी खोटे आहे. आत्मनि÷ा असली तर जिवंतपणीच हा प्रळय आवश्य प्राप्त होईल जीवाचे जीवपण गेले असता सहजच शिवपणही नाहीसे होते. आणि दोघेही पूर्णपणे आत्मस्वरूपाने परिपूर्ण होतात. जीवाला आत्मस्वरूपाची आठवण होणे, ह्याचंच नाव जीवाचा परब्रह्मात लय होणे होय. तो परमात्मा अजन्मा, अव्यय, अविनाशी, अद्वय आणि अनंत असा आहे. ब्रह्मामध्ये ब्रह्मस्वरूपाचेच जर मुळी स्फुरण होत नाही, तर तेथे ‘मी’ आणि ‘तू’ म्हणणार तरी कोण! उद्धवा! त्या वेळी परिपूर्ण परमानंदच शिल्लक उरतो असा परमानंद कोणता? असे म्हणशील, तर अज, अव्यय, आनंदस्वरूप असा जो मी श्रीकृष्ण, तोच मी परमानंदस्वरूप आहे असे समज. त्या परमानंदाला माझ्याशिवाय दुसरी जागाच नाही. उद्धवा! आणखी ज्या स्वानंदाला श्रीकृष्ण असे नाव आहे, तेच तुझेही स्वरूप आहे. त्यामध्ये मीतूपणा नाही. उद्धवा! ाखमाझ्यामध्ये आणि तुझ्यामध्ये काही वेगळेपणा नाही. म्हणूनच जीवाचे परम कारण अशी ही माझी खूण तुला सांगितली. मी वेदांचा आदिवेद, मी उपदेशाचा आद्य उपदेश माणि मी आनंदाचा आत्मानंद आहे. त्या माझा ज्ञानोपदेश तेच हे सांख्यतत्त्वज्ञान होय. ज्याप्रमाणे तळहातावर गरगरीत वाटोळा आवळा दिसतो, त्याप्रमाणेच सांख्ययोगाच्या साधनाने प्रत्यक्ष परब्रह्म तुला तुझ्या डोळय़ांनी दाखवून दिले. हा सांख्ययोगाचा अनुक्रम अन्वय-व्यतिरेकाने नीट विचार करून पाहिला असता ब्रह्म हे अखंड असून अद्वयच आहे, हे रहस्य कळून येते उत्पत्तीत, स्थितीत किंवा प्रळयात ब्रह्म हे अखंड आणि स्वतः नित्य आहे, हेच ज्ञान साधकांना खरोखर सांख्ययोगाने प्राप्त होते.
(चोविसावा अध्याय समाप्त)