प्रत्येक घरातील एकजण आयआयटीसाठी सिलेक्ट
इंडियन इन्स्टीटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये शिकणे जवळपास प्रत्येक मुलामुलीचे स्वप्न असते. देशातील सर्वात प्रतिष्ठित संस्थांपैकी एक आयआयटीमध्ये शिक्षण पूर्ण केल्यावर गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळणे निश्चित मानले जाते. आयआयटीची प्रवेशपरीक्षा अत्यंत कठिण असते, त्यात उत्तीर्ण होणे सर्वांना शक्य नसते. मुलेमुली या परीक्षेसाठी अथक परिश्रम करतात आणि कित्येक वर्षे तयारी केल्यावर त्यांना यात यश मिळत असते. परंतु बिहारमध्ये एक गाव असे आहे, जेथील प्रत्येक घरातील एक सदस्य आयआयटीसाठी निवडला गेला आहे. हे सत्र 1996 पासून चालत आले आहे.
कोचिंगशिवाय तयारी
बिहारच्या गया जिल्हय़ातील पटवाटोली गाव आयआयटीयन्सचे गाव म्हणून ओळखले जाते. या गावातून दरवर्षी 12 मुलेमुली आयआयटीसाठी निवडली जातात. या मुलांना देशातील प्रतिष्ठित संस्थेत शिक्षण घेण्याची संधी मिळते. ही मुले कुठल्याही कोचिंगशिवाय प्रवेश परीक्षेत यश मिळवत आहेत.
आयआयटीचे सीनियर्स करतात मदत
गावातील वाचनालयाच्या मदतीने ही मुले प्रवेशपरीक्षेची तयारी करतात. हे वाचनालय येथील तरुण-तरुणींकडून चालविण्यात येते, तसेच यासाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. तसेच या गावातील असे लोक ज्यांनी आयआयटीमध्ये शिक्षण घेतले आहे, तेथे येथील मुलांना ऑनलाईन क्लासद्वारे शिकवत असतात. आयआयटीत शिकत असलेल्या मुलांकडून मदत मिळाल्याने गावातील मुलांना आयआयटीच्या प्रवेशपरीक्षेची तयारी करण्यास मोठी मदत मिळते. या गावातील अनेक मुलांचे आयआयटीमध्ये सिलेक्शन होत असल्याने या गावाला ‘आयआयटी गाव’ देखील म्हटले जाते.