प्रतिनिधी /वाळपई
मुंबई उच्च न्यायालय गोवा खंडपीठाच्या आदेशानुसार वाळपई पालिका क्षेत्रात उभारेलल्या बेकायदा बांधकामावर मंगळवारी सकाळी कारवाई करण्यात आली. पोलीस बंदोबस्तात सदर बांधकाम हटविले. सरकारचे संबंधित अधिकारीही यावेळी उपस्थित होते.
वाळपई पालिका क्षेत्रातील वेळूस येथे उभारलेल्या बेकायदा बांधकामाविरोधात मुबारक अली खान यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठांमध्ये याचिका दाखल केली होती. 2017 साली दाखल करण्यात आलेल्या या याचिकेनुसार शेख दाऊद यांनी बेकायदा बांधकाम केल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. सदर याचिका गोवा खंडपीठात प्रलंबित होती. अवघ्या महिन्यांपूर्वीच यासंदर्भात सुनावणी घेण्यात आली. यामध्ये गोवा खंडपीठाने सदर बांधकामा हटविण्याचे आदेश दिले होते. मंगळवारी आज सकाळी बांधकाम हटविण्याची कारवाई हाती घेण्यात आली. यावेळी वाळपई नगरपालिकेचे मुख्य अधिकारी सूर्याजीराव राणे पोलीस बंदोबस्तासह घटनास्थळी उपस्थित होते.
सदर बांधकाम उभारताना पालिकेचा परवाना घेण्यात आला नव्हता. या प्रकरणी मुबारक अली खान यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका दाखल केली होती. याची सुनावणी होऊन सदर बांधकाम हटविण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. त्याची अंमलबजावणी पालिकेकडून करण्यात आली, अशी माहिती मुख्याधिकारी सूर्याजीराव राणे यांनी पत्रकारांनी दिली.