मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची धडक कारवाई : समुद्रकिनाऱयावर पाहणी केली मोटरसायकलवरुन गैरकृत्य आढळल्यास पोलिसांवर कारवाई
प्रतिनिधी /म्हापसा
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल रविवारी अचानक कळंगूट ते बागा समुद्रकिनाऱयावर धडक देत पाहणी केली. कळंगूट भागात सर्वत्र फिरून तेथील ग्रामस्थांकडून माहिती मिळवली. किनारी भागात अलीकडच्या दिवसांत गुन्हेगारी स्वरुपाच्या विविध तक्रारी आपल्यापर्यंत आल्या आहेत. त्या आधारे आपण येथील समुद्र†िकनाऱयावर भेट दिली. राज्यात आता कोणत्याही परिस्थितीत गैरकृत्यांना थारा दिला जाणार नाही. बेकायदेशीर मसाज पार्लर, डान्सबार आदी गैरकृत्य आज सोमवारपासून संपूर्ण गोव्यात बंद करण्यात आले आहेत. ज्या पोलीस स्थानकाच्या हद्दीत ते आढळले तर त्याला तेथील पोलीस निरीक्षक जबाबदार राहणार आहे. गैरकृत्याला थारा देणाऱया कुणाचीही गय केली जाणार नाही, असा परखड इशारा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिला.
कळंगूट समुद्रकिनाऱयावर सुमारे तासभर सर्वत्र पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री पत्रकारांसमोर बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक आयपीएस सुबीत सक्सेना त्यांच्या समवेत होते.
म्हापशातील प्रकाराची घेतली गंभीर दखल
काही दिवसांपूर्वी चंदगडहून आलेल्या पर्यटकांबाबत जो व्हिडिओ व्हायरल झाला त्याची कसून चौकशी होत असून संबंधितांवर कारवाई सुरु असून अन्य अनेक जणांवर कारवाई होईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. याबाबत अधीक्षक सोबीत सक्सेना यांच्याकडून त्यांनी याबाबत सर्व माहिती जाणून घेतली आहे. हे प्रकरण मुख्यमंत्र्यांनी गंभीर घेतले असून धडक कारवाई सुरु केली आहे.
कळंगूट ते बागा, कांदोळी दरम्यान पाहणी
गुन्हेगारीमुळे गोवा बदनाम होत आहे. पर्यटक हे आपले अतिथी आहेत. त्यांना मारहाण होणे ही राज्याची बदनामी आहे. राज्यात डान्सबार, बेकायदेशीर पार्लर सुरू असल्यास त्याची दक्षता पोलिसांनी घ्यावी, अन्यथा कारवाईस तयार रहावे, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.
पोलिसांकडून कारवाई करण्यास दिरंगाई
रविवारी पावसाळय़ापूर्वी शेवटचा रविवार असल्याने स्थानिकांबरोबर बिगर गोमंतकीय तसेच विदेशी नागरिकांनी आंघोळीसाठी गर्दी केली होती. अशा गर्दीत मुख्यमंत्र्यांनी चालत समुद्रकिनाऱयावर जाऊन सर्वत्र सर्वेक्षण व तपासणी केली. नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. कळंगूट भागात दिवसेंदिवस होणाऱया गुन्हय़ांमुळे मुख्यमंत्री बरेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. पोलिसांना सर्व अधिकार देण्यात आलेले आहेत. असे असताना पोलीस गैरकृत्यावर कारवाई करण्यास दिरंगाई करतात. कायदा सुव्यवस्था यापुढे कठोर केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
पर्यटकांना अतिथी देवो भवची वागणूक द्या
राज्यात येणाऱया प्रत्येक पर्यटकाला अतिथी देवो भव अशी वागणूक देण्याबरोबरच त्याची सुरक्षा शिरसावंद्य मानून सरकार यापुढे पर्यटकांच्या सुरक्षेची हमी घेत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. पर्यटकांचे बुडण्यापासून प्राण वाचविण्यासाठी दृष्टीचे कर्मचारी 24 तास डोळय़ात तेल घालून कार्यरत असतात. त्याचबरोबर समुद्र स्वच्छतेचेत कंत्राट कर्नाटकातील स्वयंसेवी संस्थेकडे देण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
भाडेकरूची माहिती न दिल्यास घरमालकाला दहा हजार रुपये दंड
राज्यातील गुन्हेगारीची दखल घेत घरांची तपासणी मोहीम तीव्र करण्यात येणार असून तसे आदेश राज्यात सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आले आहेत. जे घरमालक पोलिसांना भाडेकरूची माहिती देत नाहीत त्यांना दहा हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. यावेळी त्यांनी स्थानिक दुकानदार, किनाऱयावरील पर्यटकांबरोबरही चर्चा केली.
भाडोत्री मोटारसायकलने मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी
मुख्यमंत्री भाडोत्री मोटारसायकलवर पायलटच्या मागे बसून कळंगूटमध्ये फिरत असताना सर्वांच्या नजर त्यांच्याकडे लागून राहिल्या होत्या. यावेळी त्यांनी पायलट तसेच काही दुकानदार व स्थानिकांशीही संवाद साधला. पोलिसांनी व पत्रकारांनी गैरकृत्याची आपल्याला माहिती द्यावी. पोलिसांनी डोळय़ात तेल घालून गस्त वाढवावी. एखादी व्यक्ती अडचणीत असल्यास तिला सहकार्य करावे, असे मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले.
बार, रेस्टॉरंट, पार्लर, डान्सबारसाठी पोलीस परवाना आवश्यक
ज्यांनी कायद्यानुसार मसाज स्पा पार्लर परवाना घेतला आहे आणि नॉटक्रॉस मसाज जे चालणार त्यांचीच नोंदणी कागदपत्रे पाहिजेत. काही आयुर्वेदिक डॉक्टर ठेवतात तेही कायदेशीर असायला पाहिजेत. पंचकर्म असल्यास त्याचीही नोंदणी असायला हवी, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ज्या काही सर्व्हिसेस चालतात त्या यापुढे पर्यटन खात्याकडे नोंद असायला पाहिजेत. नागरिकांनी थेट ऍप डाऊन लोड करून गैरकृत्याबाबत थेट तक्रार करावी. जेण करून पोलीस त्या ठिकाणी धाव घेणार आहेत. रेस्टॉरंट, कामगार यांची चौकशी कायमस्वरुपी दरदिवशी होणार आहे. पोलीस स्थानकाचा ना हरकत दाखलाही अशा व्यववसायांना यापुढे अत्यावश्यक केला जाणार असून यामुळे गैरकृत्यांना आळास बसण्यास मदत होईल.
अतिरिक्त पोलीस स्थानक, ट्रफीक पोलीस तैनात करणार वाहतूक व्यवस्थापन यापुढे किनारी भागात चांगल्या प्रकारे करण्याचा आराखडा सरकारने आखला असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. कळंगूट, हणजूण, पेडणे या ठिकाणी किनारी भागात अतिरिक्त पोलीस स्थानक उभारण्यात येईल. शिवाय किनारी भागात अतिरिक्त पेलीस, ट्राफिकसाठी अतिरिक्त पोलीस देण्यात येतील. जेणे करून किनारी भागात कोणत्याही प्रकारचा गुन्हा दक्षिण वा उत्तरेत होणार नाही. पर्यटकांना कोणतीही हानी होणार नाही याकडे सरकार लक्ष केंद्रीत करील.