नेगील योगी रयत संघाच्यावतीने निवेदन
प्रतिनिधी /खानापूर
तालुक्यात झालेल्या पावसात मागीलवर्षी व यावर्षीही घरांची पडझड झाली आहे. मात्र पडझड झालेल्या घरांची योग्य नुकसानभरपाई मिळत नसल्याने नागरिकांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. यासाठी शासनाने तातडीने 2019 पासून आतापर्यंत झालेल्या घरांच्या पडझडीची नुकसानभरपाई देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन नेगील योगी रयत संघाच्यावतीने तहसीलदाराना देण्यात आले.
या निवेदनात असे म्हटले आहे की, 2019 पासून झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यात अनेक घरांची पडझड झाली आहे. सरकारच्या निर्देशानुसार एबीसी अशा प्रतवारी केलेली आहे. त्यानुसार नुकसानभरपाई देण्यात येते. मागीलवर्षी झालेल्या पावसात पडझड झालेल्या घरांना नुकसानभरपाई मिळाली नाही. तीच घरे यावर्षी पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत. मात्र त्यांना बी प्रतवारी घालून नुकसान भरपाईचा अहवाल तयार करण्यात आला आहे. हे सर्व चुकीचे असून जमीनदोस्त झालेल्या घरांचा पुन्हा सर्वे करून नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी यावेंळी करण्यात आली. शासन करोडो रुपये नुकसानभरपाईसाठी देत असल्याचे सांगत आहे. मग हा निधी गेला कुठे, असा प्रश्न यावेळी संघटनेचे अध्यक्ष पाटील यांनी विचारला.
यावेळी नेगील संघाचे अध्यक्ष प्रसन्न कुलकर्णी, महिला मोर्चाच्या अध्यक्षा भाग्यश्री हणबर, बसवराज मोकाशी, नागप्पा हरियाळ, कल्लाप्पा हरियाळ, गंगव्वा पुजार, कल्लाप्पा हरियाळ, बिटाप्पा कोडची उपस्थित होते.