करमाळा/प्रतिनिधी
करमाळा तालुक्यात मुसळधार पावसाने पिकांचे व बागांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकार नियमानुसार या नुकसानीचे पंचनामे केले जाणार आहेत. त्यासाठी करमाळा तालुक्यातील कृषी विभाग, पंचायत समिती व महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक झाली आहे. या बैठकीमध्ये नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तहसीलदार समीर माने यांनी सूचना दिल्या आहेत.
तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे, गटविकास अधिकारी मनोज राऊत, महसुलाचे नायब तहसीलदार सुभाष बदे, नायब तहसीलदार विजयकुमार जाधव यांच्यासह सर्व तलाठी, ग्रामसेवक व कृषीसेवक उपस्थित होते. गेल्या आठवड्यात केम, कंदर, सातोली भागात पावसाने अक्षरश धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे पिकांसह शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. याची भरपाई देण्यात यावी, अशी मागणी सर्व स्तरातून केली जात आहे.
आमदार संजयमामा शिंदे, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, माजी आमदार नारायण पाटील यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली होती. त्यानंतर अधिकाऱ्यांना पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पाऊस झाल्याबरोबर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे, भाजपचे सरचिटणीस अमरजित साळुंखे यांनी नुकसान भरपाईची मागणी केली होती.
करमाळा तालुक्यात कमी अधिक प्रमाणात सर्वत्र पावसामुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे सर्वच भागात नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर यांनी केली आहे. अजूनही पाऊस सुरु आहे त्यामुळे नुकसान होत आहे.