उत्पादनात मोठय़ा प्रमाणात घट : यंदा प्रतिकिलो केवळ 105 रुपये दर, उत्पादक अडचणीत
प्रतिनिधी /बेळगाव
यंदा बदलत्या हवामानामुळे काजू लागवडीवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होणार आहे. परिणामी उत्पादकांची चिंता वाढली आहे. गत दोन वर्षांत कोरोनामुळे काजू उत्पादकांना मोठा फटका बसला होता. दरम्यान बाजारपेठा बंद राहिल्याने विक्रीचा यक्षप्रश्न उत्पादकांना पडला होता. यंदा कोरोनाचा प्रकोप कमी झाल्यानंतर बाजारपेठा सुरळीत सुरू झाल्या आहेत. मात्र लागवडीत मोठी घट झाल्याने उत्पादक अडचणीत सापडले आहेत.
अलिकडे काजूच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. विशेषतः खानापूर आणि बेळगाव तालुक्मयात काजू क्षेत्र अधिक प्रमाणात आहे. शिवाय दरवर्षी यामध्ये वाढ होत आहे. मागील दोन वर्षांत कोरोनामुळे काजू उत्पादक अडचणीत सापडले होते. बाजारपेठा बंद होत्या. शिवाय सीमाहद्दीवर आरटीपीसीआरची सक्ती करण्यात आली होती. त्यामुळे उत्पादकांना काजूविक्री करता आली नाही. दरम्यान अनेकांच्या घरी काजू विक्रीविना पडून होती. त्यामुळे उत्पादक दोन वर्षे संकटात सापडले होते. यंदा बाजारपेठा सुरळीत सुरू झाल्या असल्या तरी लागवडीवर मोठय़ा प्रमाणात परिणाम झाल्याने उत्पादन घटले आहे. त्यामुळे उत्पादकांसमोर अडचणी वाढल्या आहेत.
कमी खर्चात अधिक उत्पादन मिळवून देणारे पीक म्हणून काजूकडे पाहिले जाते. पश्चिम भागातील बेळगुंदी, सोनोली, बेळवट्टी, बडस, बिजगर्णी, राकसकोप, बाकनूर, कल्लेहोळ, उचगाव, तुरमुरी, अतिवाड आदी भागात विशेषतः काजूचे उत्पादन होते. मात्र यंदा काजू लागवडीवरच परिणाम होऊन उत्पादनात मोठी घट झाली आहे.
उत्पादक चिंतेत
दरवषी काजूला साधारण 100 ते 150 रुपयांपर्यंत प्रतिकिलो भाव मिळत होता. यंदा मात्र केवळ 105 रुपये काजूचा दर मिळत आहे. आधीच उत्पादनात घट झाली आहे. त्यातच काजूला दरही कमी असल्याने काजू उत्पादक चिंतेत सापडले आहेत.
अनुकूल वातावरण नसल्याने उत्पादनावर परिणाम
बदलत्या हवामानाचा परिणाम काजू पिकांवर झाला आहे. उत्पादनात घट झाली आहे. विशेषतः खानापूर आणि बेळगाव तालुक्मयातच काजूचे उत्पादन होते. मात्र यंदा काजूला अनुकूल वातावरण नसल्याने उत्पादनावर परिणाम झाला आहे.
महांतेश मुरगोड (उपनिर्देशक, बागायत खाते)