बहुतांशी दुकाने बंद, उलाढाल थांबली, व्यापारी-ग्राहकांअभावी बाजारपेठ शांत
प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक राज्योत्सव दिन आणि काळय़ादिनामुळे बाजारपेठेवर परिणाम झाला. मंगळवारी ग्राहकांची वर्दळ कमी झालेली पहावयास मिळाली. विशेषतः बहुतांशी व्यापारी व दुकानदारांनी दुकाने बंद ठेवल्याने तसेच फिरत्या विक्रेत्यांच्या अनुपस्थितीमुळे दररोज गजबजणारी बाजारपेठ शांत झाली होती.
सकाळी काळय़ादिनानिमित्त मूक सायकल फेरी आणि दुपारनंतर राज्योत्सव दिनाचा दणदणाट यामुळे दिवसभर दुकाने बंद ठेवणेच पसंत केले. कार्तिकी एकादशी व तुळशी विवाहामुळे बाजारात खरेदीची गर्दी वाढेल, असे संकेत असतानाच राज्योत्सव दिन आणि काळय़ादिनामुळे बाजारपेठ थंडावलेली पहावयास मिळाली.
कोरोना संकटानंतर यंदा दिवाळीसाठी बाजारपेठ विविध साहित्यांनी बहरली होती. शिवाय मागील पंधरवडय़ापासून बाजारात खरेदीसाठी नागरिकांची रेलचेल पहायला मिळत होती. येत्या शुक्रवारी कार्तिकी एकादशी तर शनिवारपासून तुळशी विवाहाला प्रारंभ होत आहे. त्यामुळे पूजेच्या आणि उपवासाच्या पदार्थांची मागणी वाढणार आहे. मात्र मंगळवारी राज्योत्सव दिन व काळय़ादिनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत वर्दळ कमी झालेली पहायला मिळाली.
बाजारपेठेतील गणपत गल्ली, खडेबाजार, समादेवी गल्ली, पांगुळ गल्ली, मारुती गल्ली, किर्लोस्कर रोड, काकतीवेस, शनिवार खूट आदी भागातील बहुतांशी दुकाने बंद होती. त्यामुळे एकूणच बाजारपेठेच्या उलाढालीवरही परिणाम झाल्याचे दिसून आले.