वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत रशियाकडून शक्य तितक्या प्रमाणात कच्च्या इंधन तेलाची आयात करीत आहे. हे धोरण देशहिताचे असून सरकार ते पुढे सुरू ठेवणार आहे. तेल खरेदीसाठी भारत केवळ एकाच देशावर अवलंबून राहात नाही. विविध देशांकडून ही खरेदी कमी-अधिक प्रमाणात केली जाते. खरेदी व्यवहार करताना केवळ देशाचे हित लक्षात घेऊनच पावले उचलले जातात. त्यामुळे सरकारच्या धोरणाबद्दल कोणतीही शंका बाळगू नये, असे आवाहन परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी केले आहे.
भारताने सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांना रशियाकडून तेल खरेदी करण्याचा आदेश दिलेला नाही. तथापि त्यांच्या व्यवहारांमध्ये हस्तक्षेपही केलेला नाही. आंतरराष्ट्रीय परिस्थिती निवळण्याची आम्ही वाट पाहात आहोत. सध्या तेल दर भडकलेले आहेत. ते कमी व्हावेत अशी आमची इच्छा असून तेल उत्पादक देशांना तशी सूचनाही करण्यात आलेली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
आपल्या देशाच्या हिताचा विचार करताना भारत जगातील कोणत्याही इतर देशांबरोबर तडजोड करणार नाही. आमच्यासाठी देश हित सर्वात महत्त्वाचे असून त्याला सर्वाधिक प्राधान्य दिले जात आहे. कोणत्या देशाला काय वाटते, आणि कोणता व्यवहार देशासाठी लाभदायक आहे, याचा विचारच केला जातो. अन्य कोणत्याही मुद्याला महत्त्व दिले जात नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी केले.