देवतांच्या कल्याणासाठी स्वतःच्या देहाचा त्याग करण्यासह देहाचा वापर करण्याची अनुमती देणारे महर्षि दधिची या भारतात होऊन गेले आहेत. महर्षि दधिची यांच्या मृत्यूनंतर देवतांनी त्यांच्या अस्थींद्वारे वज्र तयार केले आणि त्यातून असुरांचा संहार केला होता. मृत्यूनंतर मानवी शरीराच्या अवयवांद्वारे अनेक लोकांचे कल्याळा होऊ शकते, याचमुळे अवयवदानाला आता महादान म्हटले जातेय. आमच्या काही मातब्बर नेत्यांनीही निधनानंतर स्वतःचे शरीर वैद्यकीय महाविद्यालयांना दान केले, यातून गरजूंवर अवयव प्रत्यारोपण होण्यासह वैद्यकीय संशोधनाचे कार्य होऊ शकले आहे.
भारतात मृत्यूनंतर देहदान केले जाण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. परंतु देहदान वाढणे आता काळाची गरज आहे. देशाच्या काही नेत्यांनी असे करून एक उदाहरण प्रस्थापित केले आहे. या नेत्यांमध्ये पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री ज्योति बसू, लोकसभेचे माजी सभापती सोमनाथ चटर्जी जनसंघाचे नानाजी देशमुख यांनी मृत्यूपश्चात स्वतःचा देह वैद्यकीय महाविद्यालयांना सोपविण्याची व्यवस्था केली होती. अशाच प्रकारचे उदात्त कार्य करणाऱया महनीयांमध्ये हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाच्या माजी मुख्य न्यायाधीश लीला सेठ, विहिंप नेते आचार्य गिरिराज किशोर यांचाही समावेश आहे.
अमिताभ बच्चनही करणार देहदान
देशातील अनेक वलयांकित व्यक्तींनी मृत्यूपश्चात स्वतःचे शरीर दान करण्याचे शपथपत्र केले आहे. यात प्रियांका चोप्रा, अमिताभ बच्चन, जया बच्चन, नवज्योत सिंह सिद्धू, आमिर खान, ऐश्वर्या राय बच्चन, सुनील शेट्टी, किरण शॉ मजूमदार, सलमान खान, नंदिता दास, गौतम गंभीर यासारख्या व्यक्तिमत्त्वांचा समावेश आहे.
ज्योति बसूंचे उदाहरण
ज्योति बसू यांचे 17 जानेवारी 2010 मध्ये कोलकात्यात निधन झाले होते. 24 वर्षापर्यंत पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री राहिलेले ज्योति बसू यांच्या पार्थिवाला कम्युनिस्ट पक्षाच्या मुख्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. बसू यांनी 2003 मध्ये गनदर्पण नावाच्या एका स्वयंसेवी संस्थेच्या शपथपत्रावर स्वाक्षरी करत वैद्यकीय संशोधनासाठी एसएसकेएम हॉस्पिटल, कोलकाताला देहदान करण्याची व्यवस्था केली होती. बसू यांचे नेत्र सुश्रुत आय फौंडेशनला दान करण्यात आले होते. रुग्णालयाने त्यांचा मेंदू अद्यापही सांभाळून ठेवला आहे. मृत्यूसमयी ज्योति बसू हे 96 वर्षांचे होते.
विहिंप नेते गिरिराज किशोर
ज्योति बसू यांच्या निर्णयाचे अनुकरण करत अनेक माकप नेत्यांनी असेच पाऊल उचलले हेते. विहिंप नेते गिरिराज किशोर यांनीही मृत्यूपूर्वी स्वतःच्या देहदानाची व्यवस्था केली होती. वयाच्या 94 व्या वर्षी निधन झाल्यावर गिरिराज किशोर यांचे पार्थिव आर्मी मेडिकल कॉलेजला सोपविण्यात आले होते, तर त्यांचे डोळे नवी दिल्लीतील एम्समध्ये दान करण्यात आले होते.
नानाजी देशमुख
नानाजी देशमुख हे भारतीय जनसंघाचे नेते होते. त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्नने गौरविण्यात आले आहे. नानाजींचे 27 फेब्रुवारी 200 रोजी चित्रकूट ग्रामोदय विश्वविद्यालयाच्या परिसरात निधन झाले होते. या विश्वविद्यालयाची स्थापना त्यांनीच केली होती. निधनानंतर स्वतःचे शरीर नवी दिल्लीतील स्वयंसेवी संस्था दधिची देहदान संस्थेला सोपविण्याचा निर्णय त्यांनी पूर्वीच घेतला होता. ज्यानंतर त्यांच शरीर संशोधनासाठी एम्सला देण्यात आले हेते.
साहित्यिक शेखर जोशी
ख्यातनाम साहित्यिक शेखर जोशी यांनी स्वतःचे शरीर एखाद्या वैद्यकीय महाविद्यालयाला गरजूंची मदत आणि संशोधनासाठी देण्याचा निर्णय घेतला होता. वयाच्या 90 व्या वर्षी शेखर जोशी यांचे गाजियाबाद येथील रुग्णालयात निधन झाल्यावर त्यांच्या इच्छेनुसार ग्रेटर नोएडाच्या शारदा वैद्यकीय विद्यापीठाला देहदान करण्यात आले होते.
देहदानाचे प्रमाण अत्यल्प
देशात सुमारे 63 हजार लोकांचा मृत्यू प्रतिदिन होत असतो, परंतु यातील कवळ 0.001 टक्के लोकच देहदान करत असतात. देहदानाची निगडित एक संस्था ऑर्गन इंडिया डॉट कॉमनुसार देशात सुमारे 50 हजार लोकांना हृदय प्रत्यारोपणाची आवश्यकता आहे. तर अडीच लाख लोकांना मूत्रपिंड प्रत्यारोपणाची गरज असते. देहदान किंवा अवयवदानाचे प्रमाण वाढले तरच या गरजूंना दिलासा मिळू शकतो. देशात दरवर्षी 5 लाख लोक अवयव प्रत्यारोपणाची प्रतीक्षा करत असतात. परंतु गरजूंची संख्या आणि अवयव उपलब्ध होण्यामध्ये मोठे अंतर आहे.
वैद्यकीय संशोधन
मानवी शरीर दान केल्यावर त्यातील अनेक अवयव गरजूंच्या शरीरात प्रत्यारोपित केले जाऊ शकतात. तर वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि संशोधकांसाठी हा प्रकार मानवी देह समजून घेण्यास आणि संशोधन करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो. वैद्यकीय संशोधनासाठी मानवी देह अत्यंत आवश्यक असतो. मूलगामी वैद्यकीय संशोधनात मोठी भरारी घेण्यासाठी वैज्ञानिकांनी मानवी देहांवरील विविध आजारांमुळे झालेले परिणाम जाणून घेणे गरजेचे असते.
देहदान कसे करणार?
देहदान करण्याचा निर्णय घ्यायचा असल्यास स्थानिक वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांशी यासंबंधी संपर्क करावा. या क्षेत्रात मदतीसाठी अनेक स्वयंसेवी संस्था देखील काम करत आहेत. देहदानासाठी संबंधिताला प्रथम एक स्वीकृती पत्र दोन व्यक्तींच्या समक्ष भरून द्यावे लागते. तसेच कुटुंबालाही याची कल्पना देणे योग्य ठरते.
जनजागृतीचा अभाव
भारतात अद्याप देहदानासंबंधी जागरुकतेचा अभाव आहे. तसेच धार्मिकदृष्टय़ा देखील देहदानाचा निर्णय घेण्याचा विचार लोक करत नाहीत. वैद्यकीय जगतासाठी देहदान अमूल्य बाब आहे. संशोधनातून अनेक जीव वाचविण्यास हा प्रकार उपयुक्त ठरत असतो. अनेक खासगी रुग्णालयांमध्ये देहदानाबद्दल कुठलीच जागरुकता नाही तसेच स्पष्ट माहितीही नसते.
कुठल्या स्थितीत अवयवदान?
ब्रेन डेड झाल्यावर शरीराचे अनेक अवयव दान करण्याचा निर्णय संबंधिताच्या कुटुंबीयांना घेता येतो. मृत शरीरातून डोळे, फुफ्फुस, मूत्रपिंड, यकृत, कॉर्निया, त्वचेच्या पेशी इत्यादींचे दान करता येते. अवयव दानाकरता ट्रान्सप्लांटेशन ऑफ ह्यूमन ऑर्गन ऍक्ट (होटा) 1994 लागू होत असतो.
अन्य देशांमधील स्थिती
अवयवदानात भारत जगाच्या तुलनेत खूपच मागे आहे. देशात 10 लाख लोकांमागे केवळ 0.16 लोक अवयदान करतात. तर 10 लाख लोकांमागे स्पेनमध्ये 36 जण देहदान करतात. क्रोएशियात हा आकडा 35 आणि अमेरिकेत 27 इतका अधिक आहे. 2018 मध्ये महाराष्ट्रात 132, तामिळनाडूत 137, तेलंगणामध्ये 167 आणि आंध्रप्रदेशात 45 आणि चंदीगडमध्ये केवळ 35 अवयवदान झाले होते. तामिळनाडूने मागील काही काळात या क्षेत्रात आश्वासक कामगिरी केली आहे.
भारतातील वैद्यकीय सुविधा
भारताच्या सर्व रुग्णालयांमध्ये अवयव प्रत्यारोपण विषयक उपकरणांची व्यवस्था नाही. 2017 च्या आकडेवारीनुसार देशात सुमारे 301 रुग्णालयांमध्ये अवयव प्रत्यारोपण विषयक उपकरणे होती, यातील 250 रुग्णालयेच एनओटीटीओसोबत नोंदणीकृत आहेत.
देहदानाचे अन्य महत्व
ड अलिकडच्या काळात देहदानाचा प्रसार आणि प्रचार बऱयापैकी प्रमाणात होत असून त्याला मिळणाऱया प्रतिसादाच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. अल्प प्रमाणात का असेना पण लोकांमध्ये या संबंधी जागृती होत आहे. तसेच देहदानासंबंधी ज्या गैरसमजुती होत्या त्या दूर होताना दिसत आहेत.
ड अलिकडच्या काळात वैद्यकीय विद्यार्थ्यांना विच्छेदन आणि अभ्यास यासाठी मृतदेहांची कमतरता जाणवू लागली आहे. देहदान वाढत्या प्रमाणात झाल्यास ही उणीव दूर होऊ शकते. मृत मानवी देहांचा अभ्यास हा जिवंत माणसाच्या प्राकृतिक समस्या सोडविण्यासाठीही अत्यंत उपयोगी ठरु शकतो.
ड देहदानामुळे मृत्यूनंतर देहाची विटंबना होते अशी एक गैरसमजूत आहे. तथापि, मृत्यूनंतरही जर आपण जगाच्या उपयोगी पडणार असू तर देहदान का करु नये, असा प्रभावी मुद्दाही मांडला जातो. वेगवेगळय़ा आजारांवर आणि रोगांवर संशोधन करण्यासाठी विच्छेदन महत्वाचे असते, असे सांगितले जाते.
ड देहदानामुळे मृत्यूनंतरच्या धार्मिक विधींमध्ये कोणतीही समस्या निर्माण होत नाही, असेही स्पष्ट केले जाते. अर्थात, या मुद्दय़ावर विवादही आहे. तथापि, अशा प्रकारे कोणतीही संकल्पना समाजात येत असतात विवाद होतच असतात. शेवटी आपण आपल्या सद्सद्विवेकबुद्धीनुसार निर्णय घेणे आवश्यक ठरते.
संकलन – उमाकांत कुलकर्णी