मुंबई येथील डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. के. कामत यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी/कोल्हापूर
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण शैक्षणिक व्यवस्थेत आमूलाग्र बदल करणारे आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणाला महत्त्व असून विद्यार्थ्यांच्या कौशल्य वाढीला वाव मिळेल. विद्यार्थ्यांच्या तंत्रज्ञानात्मक प्रगतीबरोबर त्यांच्या बौद्धिक, सामाजिक, भावनिक प्रगतीचा विचार केलाय. त्यामुळे बदलत्या काळात तंत्रज्ञानाचा वापरासह येणाऱया आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सज्ज व्हायला हवे, असे प्रतिपादन मुंबई येथील डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. के. कामत यांनी केले.
विवेकानंद महाविद्यालयात ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची स्वायत्त महाविद्यालयातील अंमलबजावणी’ या विषयावरील शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे होते. संस्थेच्या सेक्रेटरी प्राचार्या शुभांगी गावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षस्थानावरून बोलताना कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे म्हणाले, प्राचीन काळात नालंदा व तक्षशिला विद्यापीठात ज्याप्रमाणे आवडीचे शिक्षण देण्याची पद्धती होती. त्याप्रमाणे विद्यार्थिभिमुख शिक्षणाची मांडणी या नव्या येऊ घातलेल्या धोरणात आहे. यासंदर्भात अजूनही चिंतन सुरू आहे. आवडीप्रमाणे शिक्षण देताना त्याप्रमाणे वातावरण तयार करायला हवे.
शिवाजी विद्यापीठातील वाणिज्य आणि व्यवस्थापन अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन म्हणाले, एबीसी ही विद्यार्थ्यांनी कमावलेले क्रेडीट्स नोंदविण्याचे ठिकाण आहे. एबीसीमुळे विद्यार्थ्याला बहुविद्याशाखीय व समग्र शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. विद्यार्थी ज्या संस्थेत अथवा महाविद्यालयात 50 टक्के क्रेडीट्स मिळवेल त्याला त्या संस्थेची अथवा विद्यापीठाची पदवी मिळेल. संजय घोडवत विद्यापीठ, अतिग्रेचे अधिष्ठाता डॉ. उत्तम जाधव म्हणाले, विद्यार्थ्यांना त्यांच्या अध्ययनाचा मार्ग आणि कार्यक्रम निवडण्याची मुभा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आहे. अध्ययन आणि अध्यापनात बहूभाषिकत्व आणि भाषाशक्तींना महत्वाचे स्थान दिले आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांनी प्राध्यापक प्रशिक्षण शिबिराचा उद्देश सांगितला. प्रास्ताविक आयक्यूएसी समन्वयक डॉ. श्रुती जोशी यांनी केले. पाहुण्यांची ओळख डॉ. एस. आर. कट्टीमनी यांनी करून दिली. सूत्रसंचालन प्रा. सुप्रिया पाटील यांनी केले. यावेळी विविध महाविद्यालयातील प्राध्यापक बहुसंख्येने उपस्थित होते.