केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आयोजन : सीमावासीयांसह महाराष्ट्राचे लक्ष
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सीमाप्रश्नावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आज बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. त्याबरोबर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या वादग्रस्त विधानानंतर दोन्ही राज्यात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमी गृहमंत्री अमित शहा यांच्या समवेत होणाऱ्या या बैठकीकडे सीमावासीयांसह राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमावाद गेली सहा दशकांहून अधिक काळ प्रलंबित आहे. महाराष्ट्र सरकारने या प्रश्नी न्याय मिळावा, कर्नाटकात समाविष्ट केलेली 865 गावे महाराष्ट्रात सामील करण्यात यावी, यासह सीमावासीयांवर सुरू असलेल्या अन्याय, अत्याचाराच्या विरोधात सर्वोच्च न्यायालात धाव घेत याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील दाव्यात सध्या सुनावणी सुरू आहे. महाराष्ट्राकडून सक्षम बाजू मांडण्यासाठी बड्या सिनिअर कौन्सिल अर्थात विधिज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. डिसेंबरमध्ये सुनावणी होणार होती. पण खंडपीठातील एक न्यायमूर्ती अन्य खटल्यात असल्याने सुनावणी होऊ शकली नाही. आता ती जानेवारीत होण्याची शक्यता आहे.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर तणाव
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर जिल्ह्यातील गावांवर हक्क सांगत वादग्रस्त विधाने केल्यानंतर दोन्ही राज्यांत तणाव निर्माण झाला.
महाराष्ट्रातून त्यांचा निषेधही केला जात आहे. महाराष्ट्राच्या दोन मंत्र्यांनी बेळगाव दौरा रद्द केल्यानंतरही टीकेची झोड उठली होती. कन्नड रक्षक वैदिके संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील वाहनांवर केलेली दगडफेक, वाहनांची तोडफोड यामुळे दोन्ही राज्यातील वातावरण तणावाचे बनले होते. दोन्ही राज्यांच्या एसटी बसेसच्या फेऱ्यांवरही परिणाम झाला होता. कोल्हापुरात शाहू समाधीस्थळी बैठक घेऊन कर्नाटक सरकारचा निषेध करताना सीमावासीयांच्या पाठिशी राहण्याचा निर्धार महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला होता. त्याचवेळी महाविकास आघाडीच्या खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन त्यांना सीमाप्रश्नी केंद्राने हस्तक्षेप करावा, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना वादग्रस्त विधाने करण्यापासून रोखावे, दोन्ही राज्यात तणाव निर्माण होणार नाही, यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले होते. त्यापूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी चोवीस तासात तणाव कमी झाला नाही, तर मला माझ्या सहकाऱ्यांसह बेळगावला सीमावासीयांना धीर देण्यासाठी यावे लागेल, असा इशारा दिला होता. त्यानंतरही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून काही वादग्रस्त विधाने झाली. संसदेच्या हिवाळी अधिवेशनातही सीमाप्रश्नावर महाविकास आघाडीच्या खासदारांनी सीमावासीयांच्या व्यथा मांडल्या होत्या.
केंद्र सरकारचा पुढाकार
दरम्यान, दोन्ही राज्यातील वाढता तणाव आणि केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाची मागणी या गोष्टीचा विचार करत केंद्र सरकारने गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेण्यास पुढाकार घेतला. त्यानुसार आज बुधवारी महत्वपूर्ण बैठक होत आहे. नवी दिल्लीत होणाऱ्या या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस उपस्थित राहणार असून कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीत होणाऱ्या चर्चेतील भूमिकांवर साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कोणती भूमिका मांडणार, कर्नाटकची भूमिका काय असणार? आणि गृहमंत्री अमित शहा काय भूमिका घेतात, यावरून बैठकीचे फलित ठरणार आहे. त्यामुळे सीमावासीयांसह राजकीय वर्तुळाचेही या बैठकीकडे लक्ष असणार आहे.