उत्तर प्रदेशातील बदायू जिल्हय़ात एका व्यक्तीला उंदीर पाण्यात बुडवून मारल्यामुळे कारावासात पडावे लागले आहे. एका प्राणीप्रेमी व्यक्तीने केलेल्या तक्रारीमुळे या व्यक्तीवर कारवाई करण्यात आली. प्राण्यांना क्रूरतेची वागणूक दिल्यास किंवा त्यांचा छळ केल्यास तो कायद्याप्रमाणे गुन्हा असून त्यासाठी शिक्षेची तरतूद आहे. याच तरतुदी अंतर्गत ही कारवाई झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
बदायू जिल्हय़ातील पनवडीया या खेडय़ात मनोज नामक व्यक्तीने उंदराच्या शेपटीला दगड बांधून त्याला नाल्याच्या पाण्यात टाकले. त्यामुळे उंदीर बुडून मरण पावला. ही घटना विकेंद्रसिंह नामक पशूप्रेमीने पाहिली. उंदराला अशा क्रूर पद्धतीने मारल्यामुळे त्याने मनोज याच्या विरोधात तक्रार सादर केली. पोलिसांनी उंदराला नाल्यातून बाहेर काढले. मृतावस्थेतील उंदराचे शवविच्छेदनही करण्यात आले. या शवविच्छेदनाचा 225 रुपयांचा खर्च आरोपीकडून घेण्यात आला. आरोपी मनोज याला नंतर अटक करण्यात आली. अद्यापही तो कारावासात आहे. त्याच्यावर न्यायालयात प्रकरण दाखल करण्यात येणार आहे. प्राण्यांबरोबर क्रूरतेने व्यवहार न करणे हे माणसाचे मूलभूत कर्तव्य आहे, असे भारताच्या राज्यघटनेत स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच कायद्यानुसारही असे करणे हा गुन्हा आहे.
या प्रकरणात तक्रारदार विकेंद्रसिंह यांनाही बराच पैसा खर्च करावा लागला आहे. उंदराचे कलेवर सुस्थितीत रहावे यासाठी ते घटनास्थळापासून 50 कि.मी. दूर बरेली येथे पाठवावे लागले. यासाठी 1500 रुपये खर्च आला. हा खर्च विकेंद्रसिंह यांनीच केला. मनोज यांनी उंदराला अनेकवेळा पाण्यात बुडविले. ज्यामुळे तो मृत्युमुखी पडला असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. उंदराला मारल्यामुळे कारावास होण्याची कदाचित भारतातील ही पहिलीच वेळ असावी.