शहरातील सार्वजनिक नळांची दुरवस्था
बेळगाव : जलवाहिन्यांना गळती आणि वीजपुरवठा खंडित झाल्याने शहरवासियांना सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. मात्र काही ठिकाणी नळाच्या चाव्या नसल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. रॉयरोड टिळकवाडी येथील सुभाषचंद्र मैदानाजवळील सार्वजनिक नळाच्या चाव्या नादुरुस्त झाल्यामुळे दररोज शेकडो लिटर पाणी वाया जात असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. काही ठिकाणी पाण्याची कमतरता तर दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठय़ात व्यत्यय निर्माण होत असल्यामुळे नागरिकांना मुबलक पाणी मिळत नाही. पाण्यासाठी 8 ते 10 दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे, पण रॉयरोडवरील नळाच्या चाव्याद्वारे शेकडो लिटर पाणी वाहून गटारीत जात आहे. नळाला चाव्या बसविण्याऐवजी केवळ कपडा बांधण्यात आला आहे. नळाच्या चाव्या बसविण्याची जबाबदारी एल ऍण्ड टी कंपनीची आहे. पण कंपनीच्या अधिकाऱयांनी याकडे कानाडोळा केला आहे. पाणी टंचाईचा सामना करावा लागत असताना पाणी वाया जात असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. पाण्याची बचत करण्याच्या दृष्टीकोनातून नादुरुस्त नळाच्या चाव्या बदलण्यात याव्या आणि पाण्याचा अपव्यय टाळावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांतून होत आहे.