जालना : जालन्यातील सत्कार आणि एमआयएमला मिळत असलेल्या प्रतिसादाने मी भारावून गेलो आहे. पक्षाच्या अध्यक्षांनी आदेश दिला तर जालन्यातूनच निवडणूक लढवू, अशी इच्छा खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी जालना (Jalna) येथील ईद स्नेहमिलन आणि सत्कार कार्यक्रमात व्यक्त केली.
औरंगाबादमधून निवडून आल्यावर आता औरंगाबादचे खरे नाही, अशी भीती नागरीकांमध्ये पसरवण्यात आली होती. मात्र आम्ही कामातून जनतेची मने जिंकण्यात यशस्वी झालो आहोत. म्हणूनच गेल्या निवडणुकीत पाच हजार मतांनी विजयी झालो. तर येत्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ५० हजार मतांची आघाडी घेऊन निवडून येऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पुढे बोलताना ते म्हणाले, औरंगाबादमध्ये (Aurangabad) २०१७ मध्ये दंगल झाली. त्यात अनेकांची दुकाने जाळण्यात आली. ती विविध जातीधर्माच्या लोकांची होती. एमआयएमने सर्व दुकाने उभी करण्यास मदत केली, असेही ते म्हणाले.

