वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मागील आठ वर्षांमध्ये भारताने ‘ग्राम स्वराज्य’ आणि ग्रामपंचायतींच्या सशक्तीकरणात’ नवी उंची गाठली असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. देशभरातील गावांच्या सरपंचांना पंतप्रधानांनी शासकीय योजनांचे 100 टक्के लक्ष्य प्राप्त करण्याचे, जलसंरक्षण आणि आगामी योग दिनी विशेष कार्यक्रम आयोजित करण्याचे आवाहन केले आहे.
सरकारचा 8 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याच्या काही दिवसांनी देशभरातील सरपंचांना लिहिलेल्या एका पत्रात पंतप्रधानांनी अनेक मुद्दय़ांचा उल्लेख करत त्यांच्याकडून सहकार्य मागितले आहे. तसेच मागील 8 वर्षांमधील सरपंचांच्या योगदानाचे कौतुक केले आहे. 21 जून रोजी आयोजित होणाऱया 8 व्या आंतरराष्ट्रीय योगदिनामध्ये सर्वांना जोडण्याचा प्रयत्न करा असे पंतप्रधानांनी सरपंचांना उद्देशून पत्रात नमूद केले आहे.
ग्रामस्थांना आवाहन
योगसाठी स्वतःच्या गावातील एखादे प्राचीन किंवा पर्यटनस्थळाची निवड करा, तसेच या कार्यक्रमाची छायाचित्रे शेअर करण्याचे आवाहन मोदींनी केले आहे. योग दिन लोक अत्यंत उत्साहाने साजरा करतात. आशाकापासून हिमालय आणि समुद्रापर्यंत देशाच्या विविध क्षेत्रांमध्ये योग करताना लोकांची छायाचित्रे मागील काही वर्षांमध्ये प्रत्येक भारतीयाला गौरवाची अनुभूती मिळवून देत असल्याचे पत्रात म्हटले गेले आहे.
यंदाचा योग दिन विशेष
यंदाच्या योग दिनाचा मुख्य विषय ‘मानवतेसाठी योग’ आहे. कोरोना महामारीदरम्यान लोकांना स्वतःच्या जीवनातील आरोग्याच्या महत्त्वाची जाणीव झाली आहे. योग आरोग्याप्रकरणी किती मोठी भूमिका बजावते हे कळले असल्याचे मोदींनी म्हटले आहे.
जलसंचयावर जोर
पावसातील प्रत्येक थेंब पाणी वाचविण्याच्या आवश्यकतेवर जोर देत मोदींनी ग्रामप्रमुखांना या दिशेने स्वतःचे प्रयत्न सुरू ठेवण्याची सूचना केली आहे. वर्षा जलसंचयाचे उद्देश प्राप्त करण्यासाठी सरकारने स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षी प्रत्येक जिल्हय़ात 75 अमृत सरोवर निर्माण करण्याच संकल्प घेतला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सरपंचांचे कौतुक
केंद्र सरकारच्या सर्व महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे 10 टक्के लक्ष्य प्राप्त करण्यावर भर देत मोदींनी यात सरपंचांची मोठी भूमिका असल्याचे विधान केले आहे. शासकीय योजनांपासून कुणीच वंचित राहू नये याकरता सरपंचांनी स्वतःच्या प्रयत्नांना आणखीन वेग द्यावा. गावातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत योजनांचा पूर्ण लाभ पोहोचल्यास गावांसोबत पूर्ण देश देखील समृद्ध होणार असल्याचे मोदींनी नमूद केले आहे.
लोकशाही सशक्तीकरण
ग्राम स्वराज्य आणि पंचायतींच्या लोकशाही सशक्तीकरणात नवी उंची गाठली गेली असल्याचे ते म्हणाले. जागतिक आरोग्य संघटनेकडून अलिकडेच आशा कार्यकर्त्यांना गौरविण्यात आल्याचा उल्लेख त्यांनी केला तसेच देशात मान्सूनची चांगली कृपा व्हावी अशी प्रार्थनाही त्यांनी केली आहे.