एकनाथ शिंदे- भाजप युतीला मोठा दिलासा देताना, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अविश्वास ठरावाला सामोरे जावे न लागल्यामुळे राज्यात पूर्वीचे महाविकास आघाडी सरकार पुनर्स्थापित करता येणार नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिला. सरन्यायाधीशांच्या निर्णयानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “आपल्या लोकशाहीत अपेक्षित निकाल लागला असून अखेर सत्याचा विजय झाला आहे. लोकशाहीत बहुमताला महत्त्व आहे तसेच आपल्या देशात संविधान, कायदे आणि नियम आहेत. कोणालाही त्याबाहेर जाता येत नाही. कायदेशीर बाबींची पूर्तता करुनच आम्ही बहुमताचं सरकार बनवलं असून सुप्रीम कोर्टाने आमच्या सरकारवर शिक्कामोर्तब केलं आहे.” असे ते म्हणाले.
पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “काही लोक आम्हाला घटनाबाह्य सरकार, बेकायदेशीर सरकार म्हणून स्वतःचं समाधान करून घेऊन स्वतःची पाठ थोपटत होते. अशा लोकांना सुप्रीम कोर्टाने चपराक लगावली असून आम्हाला घटनाबाह्य म्हणणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाने कालबाह्य ठरवलं आहे.” असे ते म्हणाले
शेवटी बोलताना ते म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना अपक्ष आमदारांच्या अपात्रतेचे अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे दिले आहेत. तसेच राज्यपालांवरील मुद्द्यांवर शिंदे म्हणाले सगळ्यांनाच माहिती होतं की त्यावेळचं सरकार अल्पमतात आलं होतं. आम्ही घटनात्मक बाबींची काळजी घेऊनच सरकार स्थापन केलं आहे. त्यांच्याकडे राजीनामा देण्याशिवाय दुसरा कोणता पर्याय होता? आम्ही हा निर्णय घेताना जनमताचा आदर केला आहे. खरंतर नैतिकता कुणी जपली, हे मला सांगण्याची गरज नाही.” असे बोलून त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.