लक्ष्मी मंदिरात केली विधिवत पूजा-अर्चा
वार्ताहर /किणये
श्रावण महिना हा पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये वार पाळणुकीची परंपरा जपण्यात येते. वार पाळणुकीच्या दिवशी शेत-शिवारातील कामे बंद ठेवून वार पाळण्यात येतात. आजही ही परंपरा अनेक गावांमध्ये कायम आहे. बस्तवाड (हलगा) गावातही वार पाळणुकीला सुरुवात करण्यात आली.
मंगळवार दि. 9 रोजी सकाळी गावातील लक्ष्मी मंदिरात विधिवत पूजा-अर्चा करून वार पाळणुकीला प्रारंभ करण्यात आला. यावेळी गावातील सर्व देवदेवतांची पूजा करण्यात आली. गोपाळ पाटील व चंद्रकांत पाटील यांनी देवीची पूजा केली. त्यानंतर देवस्थान पंच कमिटी, हक्कदार बंधू व गावातील वडीलधारी मंडळींनी सर्व देवदेवतांना गाऱहाणे घातले. त्यानंतर आरती करण्यात आली.
शेत-शिवारांमध्ये भातपिके बहरून आलेली आहेत. सोयाबीन व इतर पिके बऱयापैकी आहेत. शेतामध्ये पिकपाणी बहरून यावे, गावातील नागरिकांना उत्तम आरोग्य लाभावे, रोगराई दूर व्हावी, बैल, गायी, म्हशी या जनावरांना कोणताही आजार होऊ नये. यासह जनावरांच्या माध्यमातून शेतकऱयांची प्रगती व्हावी, गावात सुख-समाधान लाभावे, यासाठी आम्ही दरवर्षी श्रावणात वार पाळणूक करून सर्व देवदेवतांना गाऱहाणे घालतो, अशी माहिती पंच मंडळींनी दिली.
सुवर्ण विधानसौधजवळ निसर्गरम्य परिसरात बस्तवाड (ह.) हे गाव आहे. गावचा विस्तार मोठा असून सर्व जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. गावातील लोकांमध्ये एकता टिकून राहावी यासाठीही ही पूजा करण्यात आली, असेही ग्रामस्थांनी सांगितले.
श्रावणातील सोमवार, मंगळवार, शुक्रवार हे वार पाळण्यात येणार आहेत. शेवटच्या श्रावण सोमवारी गावातील सर्व देवदेवतांची पूजा करून नारळ वाढविण्याचा कार्यक्रम होतो, अशी माहिती पंच मंडळींनी दिली. वार पाळणुकीच्या दिवशी शेतकरी बैलजोडी जुंपत नाहीत. शेतामधील काम बंद ठेवण्यात येते. याचे पालन गावकरी अगदी आत्मीयतेने करतात. यामुळे गावच्या सर्व ग्रामदैवतांची विशेष पूजा करण्यात येते, असेही वडीलधारी मंडळींनी सांगितले.