पुणे : प्रतिनिधी :
भारतीय जनता पक्षाने कायमच हुकुमशाही पद्धतीने लोकशाही पायदळी तुटवली आहे. महाराष्ट्रात आणि आता गोव्यातही ईडीचा धाक दाखवून आमदार फोडण्यात आल्याचा गौप्यस्फोट अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी रविवारी येथे केला.
काँग्रेस भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष माजी नगरसेवक अरविंद शिंदे, माजी शहराध्यक्ष रमेश बागवे, मोहन जोशी, ॲड. अभय छाजेड, गोपाळ तिवारी, माजी नगरसेवक आबा बागूल आदी उपस्थित होते.
आषाढी एकादशीनिमित्त सिंह यांनी पंढरपूरमध्ये जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेतले. तेथून ते पुण्यात आले होते. त्या वेळी बोलताना सिंह म्हणाले, २०१७ पासून बहुमत विकत घेण्याचा सपाटा भाजपकडून केला जात आहे. भारत हा धर्मनिरपेक्ष आणि विविधतेने नटलेला देश असताना भाजपकडून द्वेषाचे राजकारण पसरविले जात आहे. त्यातून धाक दाखवून पक्षप्रवेशाचे कार्यक्रम केले जात आहेत. आता तर भाजपकडून देशाचा तिरंगा बदलण्याबाबत ही षडयंत्र सुरू असल्याचे दिसून येत आहे. भाजपच्या या दडपशाहीच्या धोरणाविरुद्ध काँग्रेसकडून गांधी जयंतीपासून अभियान सुरू करण्यात येणार आहे. भारत जोडो अभियान असे या अभियन असणार आहे. त्यांना देशाच्या स्वातंत्र्यामध्ये सहभाग असलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या घरी काँग्रेसचा कार्यकर्ता जाणार आहे. भाजपचा खरा चेहरा हा २०२४ च्या लोकसभेपर्यंत जनतेसमोर आणण्याचा हा प्रयत्न असणार आहे.
हेही वाचा : पळून गेलेत त्यांच्यातही दोन गट; लवकरच समोर येतील