कराड प्रतिनिधी
थकीत वीज बिलांमुळे महावितरणने सोमवारी सायंकाळी 7.30 वाजता कराड नगरपालिकेच्या वारूंजी जॅकवेलचा पाणी पुरवठा तोडला होता. तो मंगळवारी दुपारी 12.30 वाजता महावितरणने जोडला. तत्पूर्वी नगरपालिकेने थकीत बिलांचे सुमारे 68 लाख 71 हजार 230 रूपये महावितरणकडे भरले आहेत. दरम्यान, वीज तोडल्याने संपूर्ण शहरात मंगळवारी सकाळी पाणी पुरवठा झाला नाही. त्यामुळे मंगळवारी सायंकाळी शहरात पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचे जल अभियंता विजय तेवरे यांनी सांगितले.
हेही वाचा >>>> महावितरणने तोडला कराड नगरपालिकेच्या वारुंजी जॅकवेलचा वीज पुरवठा
महावितरणने कराड नगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राकडील वारूंजी जॅकवेलचा पाणी पुरवठा मंगळवारी सायंकाळी तोडला. तत्पूर्वी बिले भरण्याबाबत वाटाघाटी सुरू होत्या. पालिकेच्या मुख्य अकौंटंटची झालेली बदली व मुख्याधिकारी रमाकांत डाके रजेवर असताना पैसे असूनही बिलांची पूर्तता करण्यात अडचणी येत होत्या. नगरपालिकेच्या उपमुख्याधिकारी विशाखा पवार यांनी महावितरणच्या अधिकाऱयांना विनंतीही केली होती. मात्र त्याचा विचार न करता वीज पुरवठा तोडण्याची कारवाई करण्यात आली. ‘तरूण भारत’ने याबाबतचे वृत्त मंगळवारी रात्री दिले होते. वीज बंद झाल्याने मंगळवारी सकाळी पाणी पुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली.
पालकमंत्र्यांकडून सूचना
पाणी पुरवठा ठप्प झाल्याने नगरपालिकेचे एका बाजूला प्रयत्न सुरू असताना सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांनीही प्रयत्न सुरू केले. सामाजिक कार्यकर्ते रणजित पाटील यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांना संपर्क केला. त्यांचे ओएसडी जाधव यांनी याबाबत महावितरणला लोकांची गैरसोय होऊ न देण्याबाबत सूचना करून वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या.
86 लाख 71 हजार भरले
दरम्यान, जलशुद्धीकरण केंद्राची 40 लाखांची वीज बिल थकबाकी, शिवाय स्ट्रीट लाईट, पालिका मिळकती, सार्वजनिक स्वच्छतागृहे यांची मिळून दोन महिन्यांची 68 लाख 71 हजार 230 रूपयांची थकबाकी होती. आज सकाळी याचे धनादेश तयार करून त्यावर पलूस येथे जाऊन मुख्याधिकारी डाके यांच्या सहय़ा आणण्यात आल्या. त्यानंतर दुपारी 12.30 वाजता महावितरणने वारूंजी जॅकवेलचा वीज पुरवठा सुरू केला. 1 वाजता पंपिंग सुरू झाले. सकाळी पाणी पुरवठा न झाल्याने सायंकाळपर्यंत जितक्या भरतील, तितक्या पाण्याच्या टाक्या भरून मंगळवारी सायंकाळी शहरात पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. मात्र पाण्याच्या टाक्या पूर्ण भरणार नसल्याने कमी दाबाने व कमी वेळ पाणी पुरवठा होईल, असे जल अभियंता विजय तेवरे यांनी सांगितले.
महावितरणकडून दोन वेळा कारवाई
कोरोना काळात 3 लाखांच्या थकबाकीसाठी नगरपालिकेच्या मुख्य इमारतीचा वीज पुरवठा तोडण्यात आला होता. तर आता 40 लाखांच्या थकबाकीसाठी पुन्हा वीज पुरवठा तोडण्याची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईतून संपूर्ण शहरातील नागरिकांना महावितरण वेठीस धरत आहेत. नगरपालिकेनेही वीज बिलांच्या देयकांचे नियोजन योग्य रितीने करून दर महिन्याला त्याची पूर्तता करण्याबाबत दक्षता घ्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.