आजादी का अमृतमहोत्सव पर्वाची सांगता : जात-पात, धर्म विसरून देशासाठी काम करण्याचा संदेश
प्रतिनिधी /खानापूर
तालुक्यात तसेच शहरात आजादी का अमृतमहोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी 9 वाजता सार्वजनिक ध्वजारोहण तहसीलदार कार्यालयात करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार अंजली निंबाळकर म्हणाल्या, देश स्वातंत्र्यानंतर गेल्या 75 वर्षात केंद्र व राज्य शासनांनी अनेक विकास योजना राबविल्या. या पुढेही जात, पात, धर्म, भाषा विसरून देशाच्या विकासासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडावी, असे सांगितले.
प्रारंभी महात्मा गांधींच्या प्रतिमेचे पूजन आमदारांच्या हस्ते करण्यात आले. तहसीलदार प्रवीण जैन यांच्या हस्ते तिरंगा फडकाविण्यात आला. यावेळी तहसीलदार जैन म्हणाले, देशात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव मोठय़ा दिमाखात साजरा होत आहे. 75 वर्षात देशाने सर्व स्तरावर प्रगती केली आहे.
येथील पोलीस कर्मचारी प्रकाश वड्डर यांनी ऍथलेटिक्समध्ये राष्ट्रीय स्तरावर विजय संपादन केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तालुक्यात दहावीत प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला नगराध्यक्ष मजहर खानापुरी, उपनगराध्यक्षा लक्ष्मी अंकलगी, नगरसेवक, पोलीस निरीक्षक, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सरकारी अधिकारी उपस्थित होते. या आधी शहरातील सर्व शाळा, माध्यमिक विद्यालये, महाविद्यालये, विविध शासकीय कार्यालये, सहकारी बँका, सोसायटय़ा आदी ठिकाणी झेंडा वंदनाचे कार्यक्रम झाले. अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त शिवस्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान व शासकीय कार्यालये तसेच शिवस्मारकावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती.