भारताच्या आणखी एका शत्रूची हत्या
वृत्तसंस्था/ पेशावर
पाकिस्तानात भारताच्या आणखी एका शत्रूचा खात्मा झाला आहे. अज्ञात बंदुकधाऱ्यांनी खैबर पख्तूनख्वामध्ये दहशतवादी कमांडर सैयद नूर शालोबारची गोळ्या घालून हत्या केली आहे. यापूर्वी खालिद रजा आणि बशीर अहमद यांचीही पाकिस्तानात हत्या झाली आहे. हे तिन्ही दहशतवादी भारतविरोधी कारवाया घडवून आणत होते.
या हत्यासत्रांमुळे पाकिस्तानात लपून बसलेले भारताचे शत्रू भयभीत झाले आहेत. याचमुळे दहशतवादी सलाहुद्दीनला पाकिस्तानच्या सैन्याने सुरक्षेसाठी बुलेट प्रूफ कार देखील दिली आहे. दिवाळखोर देश पाकिस्तानात या दहशतवाद्यांना ठार करण्याची जबाबदारी सिंधू देश रिव्हॉल्युशनरी आर्मीने स्वीकारली आहे. पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणा या संघटनेची धास्ती बाळगून आहेत. ही संघटना सिंध प्रांताला वेगळा देश करण्यासाठी प्रयत्नशील आहे. सिंधू देश रिव्हॉल्युशनरी आर्मीने स्वातंत्र्य मिळविण्याची शपथ घेतली आहे.
काश्मीरमध्ये दहशतवाद फैलावण्याची जबाबदारी खालिद रजाने स्वत:वर घेतली होती. खालिद हा काश्मीरमध्ये सक्रीय दहशतवाद्यांशी जोडला गेला होता तसेच दहशतवादी हल्ल्यांसाठी तोच कट आखत होता. काश्मीरमध्ये दहशतवाद फैलावण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या खालिदची पाकिस्तानात स्वत:च्या घराबाहेरच हत्या करण्यात आली आहे. तर बशीर अहमदच्या हत्येमुळे भारताला मोठा दिलासा मिळाला आहे. बशीर हा हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी होता. पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधून दहशतवाद्यांची घुसखोरी घडवून आणण्यात त्याचा मोठा हात होता.