आळसंद/ वार्ताहर
आळसंद आणि कमळापूरच्या परिसरात वावरणाऱ्या बिबट्या पासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी मोठ्याने गाणी लावा म्हणजे बिबट्या पळून जाईल हा वनाधिकाऱ्यांचा सल्ला विधानसभेत चांगलाच गाजला. आमदार अनिल बाबर यांनी उपस्थित केलेले या प्रश्नावर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.यामुळे वनविभागाचे अक्षरशः वाभाडे निघाले आहे.
गेल्या महिन्यात खानापूर तालुक्यातील कमळापूर आणि आळसंद गावात बिबट्याचा वावर होता. बिबट्याच्या भयाने शेतकऱ्यांनी ऊसतोड थांबवली होती. रात्री आणि दिवसा सुद्धा लोक घराबाहेर पडायला घाबरत होते. वन विभागाला हा बिबट्या जेर बंद करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. मात्र बिबट्याला पकडून जंगलात सोडण्याऐवजी त्याच्या सह जगायची सवय लावून घ्या, रात्रीच्या वेळी शेतावर जाताना मोठ्याने गाणी लावून जा म्हणजे बिबट्या पळून जाईल असे विचित्र सल्ले वन विभागाने दिले होते.
लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असताना सुद्धा वनविभाग काही करायला तयार नाही म्हणून ग्रामस्थांनी आमदार अनिल बाबर यांच्याकडे तक्रार केली होती. मात्र आमदारांचे ऐकून घेऊन सुद्धा अधिकाऱ्यांनी कोणतीही हालचाल केली नाही. त्यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या या कृतीचा पाढा बाबर यांनी विधानसभेच्या अधिवेशनात वाचला. यावेळी बाबर यांनी गाणी लावा म्हणजे बिबट्या पळून जाईल असा गमतीदार सल्ला वनाधिकाऱ्यांनी दिला अशी तक्रार केली. विरोधी बाकावरील सदस्यांना सुद्धा याबद्दल नवल वाटून त्यांनी पुन्हा पुन्हा काय सल्ला दिला याची माहिती बाबर यांच्याकडून जाणून घेतली. यादरम्यान विधिमंडळात सरकारी कर्मचाऱ्यांचा संप आणि जुनी पेन्शन हा विषय गाजला होता.
तोच धागा पकडून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आमदार बाबर यांच्या निवेदनावर भाष्य केले. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षात सुद्धा अधिकाऱ्यांना हक्क पाहिजेत पण कर्तव्य आणि जबाबदारी पार पाडायला नको. अशा बेजबाबदार लोकांच्या बाबत कोणीही आपल्याकडे तक्रार करावी. असा सल्ला देणारे अधिकारी कोण आहेत ते कळवा म्हणजे आपल्याकडे भरपूर कॅसेट्स आहेत त्यांना योग्य ते गाणे भरून पाठवून दिले जातील असे सांगून मुनगंटीवार यांनी कारवाईचे संकेत दिले. आता या प्रकरणांमध्ये वनमंत्र्यांच्या घोषणानंतर काय कारवाई होणार याकडे खानापूर तालुक्याचे लक्ष लागले आहे.