पाचगाव ग्रामस्थांना नियमित पाणीपुरवठा करा, आमदार ऋतुराज पाटील यांची सूचना
पाचगाव/प्रतिनिधी
अपुऱ्या व अनियमित पाणीपुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या पाचगाव परिसरातील नागरिकांनी मंगळवारी जरग नगर नाका येथे सुमारे दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. अनेक महिन्यापासून पाचगाव परिसरातील उपनगरांमध्ये नागरिकांना पाण्याची समस्या भेडसावत आहे . अपुऱ्या व अनियमित होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी मंगळवारी संध्याकाळी चार वाजता जरग नगर नाक्याजवळ रस्ता रोको आंदोलन केले. पावसाळ्यात पावसात पाण्यासाठी कराव्या लागणाऱ्या आंदोलनामुळे नागरिक संतप्त झाले होते.
नागरिकांच्या आंदोलनामुळे शाखा अभियंता प्रिया पाटील व शहर उप अभियंता एन एस पाटील हे आंदोलन स्थळी आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करत पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली . शहराला पाणीपुरवठा करून झाल्यानंतर राहिलेले पाणी पुरवठ्याचे पाचगावकरांसाठी नियोजन करू तसेच पाचगाव ग्रामपंचायतीनेही पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी असे संबंधित अधिकाऱ्यांनी आंदोलनकाना सांगितले. यामुळे आंदोलक संतप्त झाले.
आठ दिवसात पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर सुभाष नगर पंपिंग स्टेशनला टाळे ठोकण्याचा इशारा देऊन आंदोलकानी आंदोलन मागे घेतले. सुमारे दोन तास सुरू असणाऱ्या रास्ता रोको आंदोलनामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.
हे ही वाचा : Kolhapur : पूर नियंत्रणासाठी पाटबंधारे विभागाचे काटेकोर नियोजन
या आंदोलनात शिवस्वरूप नगर, पोस्टल कॉलनी, हरि पार्क ,शांतादुर्गा कॉलनी, द्वारका नगर, सहजीवन सोसायटी यासह इतर अनेक कॉलनी मधील नागरिक उपस्थित होते . यावेळी मंगेश मोरे, शीला साखरकर ,रोहित कुलकर्णी, सुवर्णा पवार, स्नेहा पवार, पुष्पलता देसाई, भिकाजी गाडगीळ, सागर दळवी, विशाल पाटील यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होत.
पाचगाव ग्रामस्थांना नियमित पाणीपुरवठा करा – आमदार ऋतुराज पाटील
पाचगाव ग्रामस्थांना नियमित पाणीपुरवठा करण्यात यावा अशा सूचना आमदार ऋतुराज पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीत दिल्या. पाचगांव ग्रामस्थांना होत असलेल्या अनियमित पाणी पुरवठ्या बाबत पाचगांव ग्रामस्थांच शिष्टमंडळ, महापालिका आयुक्त, आ. ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.