मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती : मंत्री-आमदारांचे रिपोर्ट कार्ड तयार करणार
प्रतिनिधी /पणजी
भाजपचे आमदार-मंत्री यांना म्हाळगी प्रबोधिनी (मुंबई) येथे प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येणार असून प्रत्येक मंत्र्यांचे-खात्याचे ध्येय (व्हिजन डॉक्युमेंट) लक्ष्य, रिपोर्टकार्ड तयार करून पारदर्शक कारभार करण्यावर भर देण्यात येणार आहे. येत्या 30 मे रोजी पंतप्रधान मोदी सरकारची चालू कारकिर्दीतील 4 व एकूण 8 वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्त 30 मे ते 15 जून या कालावधीत राज्यात विविध कार्यक्रम-उपक्रम राबवण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत वरील माहिती देऊन सांगितले की, भाजपचे गोवा प्रभारी सी. टी. रवी यांनी सुकाणू समिती, आमदार, मंत्री अशा वेगवेगळय़ा तीन बैठका घेऊन संघटनात्मक विषयांवर चर्चा केली. त्यावेळी राज्य कार्यकारिणीची बैठक पणजी शहराच्या बाहेर इतरत्र दुसऱया शहरात आयोजित करण्याचे ठरले असून ती जूनच्या पहिल्या आठवडय़ात होणार आहे. पंचायत निवडणुकीत भाजपचे पदाधिकारी-कार्यकर्ते मोठय़ा प्रमाणात निवडून यावेत म्हणून तयारी करण्याचे निश्चित झाल्याचे सांगण्यात आले.
‘सरकार तुमच्या दारी’ राबविणार
पंचायत निवडणुकीसह 2024 ची लोकसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठी बैठकांतून भर देण्यात आला असून मोदी पर्व सर्वांपर्यंत पोहोचावे म्हणून विविध कार्यक्रम-उपक्रम करण्याचा ठरावही घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. लोकसभेच्या गोव्यातील दोन्ही जागा भाजपला मिळण्यासाठी आतापासूनच कामाला लागण्याच्या सूचना बैठकांमधून आमदार-मंत्र्यांना देण्यात आल्या आहेत. ‘सरकार तुमच्या दारी’ हा उपक्रम पुन्हा एकदा सुरू करणार असल्याची माहिती डॉ. सावंत यांनी दिली. गोवा सरकार अंत्योदय तत्त्वावर चालत असून स्वयंपूर्ण करण्याची मोहीम चालूच राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले. भाजपचे सरचिटणीस दामू नाईक त्यावेळी उपस्थित होते.
आमदार, मंत्री यांना दिली समज
भाजपचे आमदार, मंत्री यांच्यातील कुरबुरी, विसंवाद लक्षात घेऊन त्यांना समज देण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी यांनी आमदार, मंत्री यांची स्वतंत्र भेट घेतली आणि कोणताही निर्णय करण्यापूर्वी पक्षाला विश्वासात घेण्याची सूचना केली आहे. मंत्रिपदे, खाती, महामंडळे यावरून काहीजण नाराज असून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न रवी यांनी केला. स्वतःसाठी नव्हे तर जनतेसाठी कार्यरत रहा, त्यांच्यासाठी काम करा असे सांगून त्यांनी मंत्र्यांच्या-आमदारांच्या कार्याचा आढावा घेतला.