चार कोटींचा प्रकल्प उद्घाटनापासून बंदच …म्हणे प्रशिक्षित चालक नाही!
पणजी : तब्बल 3.9 कोटी ऊपये खर्च करून निर्माण केलेली राज्यातील पहिली ’सौर’ फेरीबोट उद्घाटनापासूनच विनावापर राहिल्याने सध्या दाहक ’उन्हात’ अक्षरश: करपत असल्याचे दिसून आले आहे. सुमारे चार महिन्यांपूर्वी म्हणजे दि. 13 ऑक्टोबर रोजी मोठा गाजावाजा करत या सौर फेरीबोटीचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर असंख्य मान्यवर व प्रतिष्ठित व्यक्तींच्या सोबत स्वत: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या फेरीबोटीतून मांडवीची सफर केली होती. त्यावेळी बोलताना त्यांनी सदर फेरीबोट चोडण ते पणजी मार्गावर चालवण्याची घोषणा केली होती. त्याचबरोबर बदलत्या तंत्रज्ञानाची कास धरताना पारंपरिक फेरीबोटी कालबाह्य ठरविण्यात येणार असून सौरउर्जेचा अधिकाधिक वापर करण्यासाठी राज्यातील सर्व मार्गावर सौर फेरीबोटी सुरू करण्यात येतील असेही त्यांनी जाहीर केले होते. आश्चर्यकारक प्रकार म्हणजे सुमारे चार कोटींची बोट बांधून उद्घाटनही करण्यात आले तरी अद्याप तिच्यासाठी तज्ञ चालकच नसल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे गेल्या चार महिन्यांपासून सदर फेरीबोट हा ताजा ’पांढरा हत्ती’ बनला आहे. हा प्रकार म्हणजे आधी कळस मग पाया, असा प्रकार बनला असल्याची टीकी सामाजिक कार्यकर्ते आयरिश रॉड्रिगीश यांनी केली आहे. करदात्यांच्या पैशांची सरकार कशी उधळपट्टी करत आहे, त्याचे हे ज्वलंत उदाहरण आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.