पद्मश्री विनायक खेडेकर यांचे उद्गार : बिल्वदल परिवारातर्फे 6 व्या किर्तन संमेलनाचे थाटात प्रारंभ
वार्ताहर /माशेल
आपल्या भारतीय संस्कृतीत सज्जन माणसाचे दोन हात एकत्र येतात ते ‘नमस्कार’ करण्यासाठी ते दुवॉ मागण्यासाठी विभक्त होऊ नये, त्यासाठी आजच्या तांत्रिक युगातील कीर्तने देश, काळ व परिस्थितीनुसार व्हावीत. समाजातील अनिष्ठ रूढी आणि प्रथांचे निमुर्लन करून लोकांमध्ये जागरण व सन्मार्गाचे दर्शन घडविणारे किर्तनकार घडणे ही आज काळाची गरज बनलेली आहे, असे उद्गार गोमंतकीय लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक पद्मश्री विनायक विष्णू खेडेकर यांनी खांडोळा माशेल येथे बिल्वदल परिवाराच्या 6 व्या कीर्तन संमेलनात काढले.
सांखळी येथील बिल्वदल परिवार आणि श्री संस्थान गणपती मंदिर खांडोळा यांच्या सहकार्याने आयोजित 6 वे कीर्तन संमेलन काल रविवारी खांडोळा येथील श्री गणपती मंदिराच्या सभागृहात ते प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उद्योजक संदेश साधले, गणपती मंदिर खांडोळाचे अध्यक्ष प्रितम खांडेपारकर, बिल्वदल परिवाराचे अध्यक्ष तथा दै. तरूण भारतचे गोवा आवृत्ती संपादक सागर जावडेकर, राजेश गायतोंडे, ऍड करूणा बाक्रे, पुरोहित महेश सुखठणकर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना पद्मश्री खेडेकर म्हणाले आज तांत्रिक युगात मोबाईल, युटयुब, लाईव्ह टिव्हीच्या माध्यमात वावरताना हरीदास ही केवळ भक्तीची कास धरलेले अध्यात्माचे व्रत अंगिकारलेला तपस्वी न बनता मुक्तीपुर्व काळात ज्याप्रमाणे कीर्तनकारांने समाजप्रबोधनाचे कार्य केले त्याप्रमाणे आजच्या युवा कीर्तनकाराचे कार्य अपेक्षित असल्याचे ते म्हणाले.
कीर्तन संमेलनाचा प्रारंभ डॉ. कु उर्वी फडके यांच्या ईशस्तवनाने झाला. प्रज्वलिता गाडगीळ व सहकाऱयानी मंगलाचारण व नामस्मरण सादर केल्यानंतर दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. प्रमुख पाहुण्याच्याहस्ते उद्योजक सुदेश साधले, श्री गणपती मंदिराचे पूजारी महेश सुखठणकर यांचा शाल, श्रीफळ व मानचिन्ह प्रदान करून सत्कार करण्यात आला. पद्मश्री विनायक खेडेकर यांचा बिल्वदल परिवारातर्फे मानचिन्ह प्रदान करून सन्मान करण्यात आला.
प्रितम खांडेपारकर यांनी स्वागत केले. प्रास्तविक सागर जावडेकर यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सिद्धी उपाध्ये यानी तर ऍड. करूणा बाक्रे यांनी आभार मानले. गोमंतकातील व गोव्याबाहेरील कीर्तनकारांची अविट गोडीची आणि पारंपारिक कीर्तनाचे सादरीकरण झाले. सकाळच्या पहिल्या व दुसऱया सत्रात नामवंत कीर्तनकारांनी कीर्तने सादर केली. एकूण दहा प्रख्यात किर्तनकारांच्या सुश्राव्य कीर्तने सादर केली. कीर्तन संमेलनात ह.भ.प. वंदना जोशी, ह.भ.प. विष्णू गावस, ह.भ.प. सर्वेश साळगावकर, ह.भ.प. नुतन रेवाडकर, ह.भ.प. दत्तगुरू अभ्यंकर, ह.भ.प. उर्वी फडके, ह.भ.प. स्वतेजा कुंभार, ह.भ.प मनस्वी नाईक व समारोपाला ह.भ.प. संज्योत केतकर (पुणे) यांचे सुश्राव्य कीर्तन झाले.