पाचहून अधिक लोक एकत्र न येणे, मिरवणुका, सभा घेण्यास मज्जाव : अपर जिल्हादंडाधिकारी
कोल्हापूर / प्रतिनिधी
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागात कन्नड वेदीका संघटनेकडून महाराष्ट्रातील वाहनांची झालेली तोडफोड झाली आहे. त्याची कोल्हापूर जिह्यात काही राजकीय पक्ष व संघटकांनडून तीव्र प्रतिक्रिया उमटून येथे व्यवसाय करणारे कन्नड भाषिक लक्ष्य होण्याची शक्यता आहे. तसेच महाविकास आघाडीने कर्नाटक सरकार विरोधात उद्या, शनिवारी कोल्हापूरात तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर जिह्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू आहे. या पार्श्वभूमीवर जिह्यात आज, शुक्रवारपासून 23 डिसेंबरपर्यंत अपर जिल्हा दंडाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी बंदी आदेश लागू केले आहेत.
या बंदी आदेशानुसार कोल्हापूर जिल्हयामध्ये पाच किंवा त्याहून अधिक लोकांनी एकत्र येणे, जमाव जमविणे, मिरवणूका काढणे, सभा घेणे, तलवारी, भाले, दंडे, बंदूका, सुन्या, काठय़ा किंवा लाठया किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तु बरोबर नेणे, कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा क्षेपणास्त्रs सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जाहिरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्ये वाजविणे. ज्यामुळे राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे, हावभाव करणे, अगर सोंग आणणे आणि अशी चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणत्याही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे किंवा त्यांचा जनतेत प्रसार करणे याला बंदी घालण्यात आली आहे.
त्याचबरोबर कर्तव्यावर असणारे सरकारी अधिकारी, कर्मचारी, निवडणूकीचे कामकाज करणाऱ्या, तसेच सर्व जातीधर्माचे सण, उत्सव, जयंती, यात्रा आदीसाठी शांततामय मार्गाने साजरे करण्याकरीता जमा होणारा जनसमुदाय यांना व लग्न, इतर धार्मिक समारंभ, सण, यात्रा, प्रेतयात्रा इत्यादी यांना हा बंदी आदेश लागू असणार नाही.