लायन्स क्लबने विविध उपक्रम राबवून जपली सामाजिक बांधिलकी
प्रतिनिधी /खानापूर
येथील लायन्स क्लबचा 50 वा अधिकारग्रहण समारंभ नुकताच करंबळ येथील पाटील गार्डनमध्ये माजी प्रांतपाल श्रीकांत मोरे यांच्या उपस्थितीत पार पडला. लायन्सचे नूतन अध्यक्ष म्हणून बसवराज हमण्णावर, सचिव रविसागर उप्पीन, खजिनदारपदी भाऊराव चव्हाण यांना पदे बहाल करण्यात आली.
माजी प्रांतपाल श्रीकांत मोरे यावेळी म्हणाले, खानापूर लायन्स क्लबने गेल्या 50 वर्षात विविध उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपली आहे. खानापूर लायन्स क्लबला वेगळी परंपरा व इतिहास आहे. 50 वर्षांपूर्वी अत्यंत मागास व दुर्गम असलेल्या खानापूरसारख्या ठिकाणी लायन्सने अनेक उपक्रम राबवून वेगळा ठसा उमटविला आहे. आज आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना सर्वांनी सामाजिक जाणीवा जिवंत ठेवून समाजासाठी काही तरी केले पाहिजे, हेच लायन्सचे ब्रिद असल्याचे पदग्रहण कार्यक्रमात सांगितले.
यावेळी लायन्स क्लबच्यावतीने हलकर्णी ग्रा. पं. पीडीओ पानीवाले तसेच खानापूरच्या रहिवासी द्राक्षायणी पाटील यांची न्यायाधीशपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. मावळते अध्यक्ष एम. जी. बेनकट्टी यांनी नूतन अध्यक्षांचा परिचय करुन दिला. यावेळी वैशाली नायडू, श्रीकांत शानभाग, डॉ. डी. पी. वागळे, भास्कर पाटील, यशोदा पाटीलसह अनेकांनी विचार मांडले.
लायन्स क्लबचे मदन देशपांडे, प्रकाश बेतगावडा, महेश पाटील, निखिल बस्तवाडकर, चेतन मणेरीकर, एम. जी. कुमार, वैशाली पाटील, प्रकाश गावडे, संभाजी पाटील, सुरेश मुरकुंबी, ब्रह्मानंद कोचेरी, सतीश पाटील, महांतेश राऊत उपस्थित होते.
उपस्थितांचे स्वागत लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष जुनेद तोपिनकट्टी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. राधाकृष्ण हेरवाडेकर यांनी केले.