मिनी मार्केट ही प्रत्येक पंचायतीची गरज : आमदार तुयेकर, नवीन कचरा प्रक्रिया यंत्राचेही उद्घाटन
प्रतिनिधी /फातोर्डा
मिनी बाजार संकुल, जे येथे उभारण्यात आले आहे, त्यामुळे रुमडामळ पंचायतीमधील 32 जणांना आपला व्यवसाय करण्यास मिळणार आहे. लोकांना एकाच छताखाली हवे ते खरेदी करता येईल. तसेच रस्त्याच्या कडेला बसून विक्री करणाऱयांची आणि त्यांच्याकडील साहित्य खरेदी करण्यासाठी येणाऱया ग्राहकांची रस्त्यावर होणारी गर्दी बंद होऊन वाहतूक समस्या सुटेल, असे प्रतिपादन नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर यांनी केले
रुमडामळ दवर्ली पंचायतीने जिल्हा पंचायत निधीतून उभारलेल्या मिनी बाजार संकुल आणि सेंद्रिय तसेच बायोडिग्रेडेबल कचरा प्रक्रिया यंत्राचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी सरपंच विनायक वळवईकर, उपसरपंच मधुकला शिरोडकर, पंच विश्वदास नाईक, ईशा नाईक, सोफिया शेख, अविता चोडणकर, समुल्ला फणीबंद उपस्थित होते. पुढे बोलताना तुयेकर म्हणाले की, सरकारकडून मिळणाऱया निधीचा योग्य वापर कसा करावा हे रुमडामळ पंचायतीकडून शिकावे. यासारख्या मार्केटची गरज प्रत्येक पंचायतीमध्ये आहे आणि त्यासाठी त्यांनी फक्त जागा उपलब्ध करून दिली, तर आमदार या नात्याने मी बाजार संकुल उभारण्यासाठी सहकार्य करेन, असे त्यांनी स्पष्ट केले.
सरपंच वळवईकर यांनी स्वागत केले व सदर मिनी बाजार संकुल उभारण्यासाठी तुयेकर यांचा मोठा आधार लाभल्याचे सांगितले. तुयेकर ज्यावेळी जिल्हा पंचायत सदस्य होते त्यावेळी त्यांना मिळालेल्या निधीतून सदर संकुल 5 ते 6 महिन्यांत उभारण्यात आले आहे. तसेच नवीन कचरा प्रक्रिया यंत्राच्या मदतीने प्लास्टिक कचऱयाची भुकटी बनविण्यास मदत होईल. अशा प्रकारे आतापर्यंत एकंदरित कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी 5 ते 6 कोटींचा खर्च आला असल्याचे त्यांनी सांगितले.
पंच चोडणकर म्हणाल्या की, 14 व्या वित्त आयोगाच्या अंतर्गत मिळालेल्या निधीतून कचरा प्रकल्प उभारलेला आहे. यासाठी तत्कालीन आमदार लुईझिन फालेरो यांची खूप मदत लाभली होती. या प्रकल्पात 2 टन कचरा हाताळण्याची क्षमता आहे. आत्मनिर्भर योजनेच्या निधीतून सीसीटीव्ही कॅमेरे, सौरदिवे खरेदी करण्यात आलेले आहेत. आरडीएशी निगडीत कामांच्या फायली प्रलंबित राहिल्या आहेत. त्या तुयेकर यांनी हाती घेतल्या आहेत. या निधीतून बालोद्यानाची दुरुस्ती, पंचायतीचे सौंदर्यीकरण करण्यात येणार असून बुजलेली विहीर सुद्धा पुन्हा बांधण्यात येईल. आमदार तुयेकर यांच्या सहकार्याने जास्तीत जास्त विकासकामे करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.