गुजरात दौऱयावर पंतप्रधान मोदी : वर्गात मुलांसोबत घालविला वेळ
वृत्तसंस्था / गांधीनगर
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी गुजरात दौऱयादरम्यान गांधीनगर येथील डिफेन्स एक्सपो 2022 चे उद्घाटन केले आहे. त्यानंतर अडालजमध्ये मिशन स्कूल ऑफ एक्सीलेंसचा शुभारंभ त्यांच्याहस्ते झाला असून यादरम्यान पंतप्रधान मोदींनी शाळेमधील वर्गात जात मुलांसोबत वेळ घालविला आहे. शिक्षण व्यवस्था आता ‘स्मार्ट’ झाली असून गुजरातमधील शिक्षण व्यवस्था सुधारल्याचे उद्गार पंतप्रधानांनी काढले आहेत.
मागील दोन दशकांमध्ये गुजरातच्या शिक्षण क्षेत्रात अभूतपूर्व परिवर्तन घडून आले आहे. 20 वर्षांपूर्वी 100 पैकी 20 मुले शाळेतच जात नव्हती. तर जी मुले शाळेत जायची, त्यातील बहुतांश मुलेमुली आठवीपर्यंत शिकल्यावर शाळा सोडत होती. त्यातही मुलींची स्थिती अधिकच खराब होती. परंतु स्थिती आता सुधारली असल्याचे मोदींनी म्हटले आहे.
तत्पूर्वी पंतप्रधानांनी गांधीनगरमध्ये डिफेन्स एक्सपो-22 चे उद्घाटन करण्यासह उत्तर गुजरातच्या दीसामध्ये वायुदलाच्या नव्या तळाच्या कार्याचा शुभारंभ केला आहे. केवळ भारतीय कंपन्या भाग घेत असलेला हा देशाचा पहिलाच डिफेन्स एक्सपो आहे. केवळ मेड इन इंडिया संरक्षण उपकरणेच सामील झाली असल्याचे मोदींनी म्हटले आहे. संरक्षण दलांकडून आयातबंदी असणाऱया 101 सामग्रींची यादी जाहीर केली जाणार आहे. तसेच 411 संरक्षण उत्पादने केवळ स्थानिक स्तरावरच खरेदी केली जाऊ शकतील असे त्यांनी सांगितले आहे.
एचटीटी-40चे अनावरण
डिफेन्स एक्सपोमध्ये पंतप्रधानांनी एचटीटी-40 चे अनावरण केले आहे. हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजेच एचएएलने वायुदलासाठी एचटीटी-40 प्रशिक्षणार्थी विमान तयार केले आहे. वायुदलाला सुमारे 105 प्रशिक्षणार्थी विमानांची गरज आहे. वायुदलाकडे सध्या प्रशिक्षणार्थी विमानांची संख्या 260 आहे, तर प्रत्यक्षात आवश्यकता एकूण 388 विमानांची आहे. वायुदलाकडे प्रशिक्षणार्थी विमान म्हणून 75 पीसी-7 मार्क-2 बेसिक ट्रेनर विमाने आहेत. 86 किरण मार्क-1 आणि मार्क 1 ए विमाने असून ती इंटरमीडिएट जेट ट्रेनर आहेत.
संरक्षणनिर्यात 8 पट वाढली
पंतप्रधान मोदींनी यावेळी संरक्षण निर्यात आणि त्याच्या वाढत्या लोकप्रियतेची आकडेवारीही मांडली आहे. मेक इन इंडिया संकल्पना संरक्षणक्षेत्राची यशोगाथा ठरत आहे. मागील 8 वर्षांमध्ये भारताची संरक्षणनिर्यात 8 पटीने वाढली आहे. 2021-22 मध्ये भारताची संरक्षण निर्यात सुमारे 13 हजार कोटी रुपयांची झाली असून आगामी काळात आम्ही हा आकडा 40 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचविण्याचे लक्ष्य बाळगले असल्याचे मोदींनी सांगितले आहे.
भारताकडून जगाला अपेक्षा
आंतरराष्ट्रीय सुरक्षेपासून जागतिक व्यापारापर्यंत सागरी सुरक्षा एक जागतिक प्राथमिकता म्हणून समोर आली आहे. अशा स्थितीत जगाच्या भारताकडून असलेल्या अपेक्षा वाढल्या आहेत. या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी भारत शक्य ते सर्व प्रयत्न करत राहणार आहे. हा डिफेन्स एक्सपो भारताबद्दल जागतिक विश्वासाचेही प्रतीक असल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत.
भारतापुरती मर्यादित राहू नये लाभ
अंतराळात भविष्यातील संधी पाहता भारताला स्वतःही ही तयारी आणखी वाढवावी लागणार आहे. संरक्षण दलांना नवे तंत्रज्ञान स्वीकारण्यासह आत्मसात करावे लागतील. अंतराळात भारताची शक्ती मर्यादित राहू नये तसेच याचा लाभ केवळ भारतीयांपुरती मर्यादित राहू नये असा आमचा दृष्टीकोन असल्याचे मोदी म्हणाले.