माजी सरपंच राजश्री गावकर यांच्याकडून अल्प कार्यकाळात चांगली छाप : मंत्री फळदेसाई
प्रतिनिधी /सांगे
मळकर्णे पंचायतीच्या सरपंच म्हणून ताबा घेतल्यानंतर अवघ्या काही दिवसांच्या कारकिर्दीत माजी सरपंच राजश्री राजेश गावकर यांनी विकासकामांची चांगली छाप पाडलेली आहे. त्यांच्या कार्याची पावती आज पंचायत प्रभागात दिसून येते, असे समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई म्हणाले. मळकर्णे येथे जिल्हा पंचायत निधीतून राबविण्यात आलेल्या गणेशमूर्ती विसर्जनस्थळाचे उद्घाटन, गटाराची पायाभरणी तसेच संरक्षक भिंतीच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते.
सरपंच किंवा पंच म्हणून निवडून आल्यानंतर आपापल्या प्रभागाचा विकास व्हावा असे नागरिकांना अपेक्षित असते. त्यात जो पंच-सरपंच बाजी मारतो तो सदैव लोकांच्या आठवणीत राहतो. राजश्री यांच्याकडून राबविण्यात आलेल्या कामांमध्ये सुमारे 38 लाख खर्चून पाच संरक्षक भिंती, गटार व अन्य कामांचा समावेश आहे. तसेच जिल्हा पंचायत निधीतून सुमारे साडेतीन लाख खर्चून गणेशमूर्ती विसर्जन शेड व गणेशमूर्ती ठेवण्यासाठी स्थान तसेच पायऱया बांधल्याने अनेक वर्षांची समस्या सुटण्यास मदत झालेली आहे, असे फळदेसाई म्हणाले.
या कामांच्या बाबतीत माजी सरपंच राजश्री यांना त्यांच्या पतीचे चांगले सहकार्य लाभलेले आहे. पूर्वीच्या सरपंचाच्या तुलनेत राजश्री यांचे काम ठळकपणे दिसून येत आहे. भाजप सरकार व आपले सहकार्य त्यांना सदैव लाभणार. कारण काम करणाऱया व्यक्तीमागे पक्ष सदैव ठामपणे उभा राहतो. हा विकास गावच्या भल्यासाठी असतो. सरपंच नसताना विरोधात राहून राजश्री गावकर यांनी आपल्या प्रभागासाठी काम केले व आपण आमदार होताच सरपंचपदावर आरूढ होऊन कामांचा सपाटा लावला. याला म्हणतात चांगले सरपंच, असे मंत्री फळदेसाई म्हणाले.
‘फळदेसाई यांचे मोलाचे सहकार्य’
यावेळी बोलताना राजश्री गावकर म्हणाल्या की, मंत्री फळदेसाई यांच्या सहकार्याने आपल्याला सरपंच बनता आले तेव्हा अडून पडलेल्या फाईल्सबाबत पाठपुरावा करून कामे पूर्ण करून घेण्याची संधी लाभली. पंचायतीवर प्रशासकाची नेमणूक झाल्याने आणखी तीन महत्त्वाची कामे मार्गी लावणे बाकी राहिले. परंतु मंत्री फळदेसाई यांच्या सहकार्याने ती कामे सुद्धा येत्या पंचायत निवडणुकीनंतर मार्गी लागणार यात शंका नाही, असे त्यांनी सांगितले.
राजेश गावकर म्हणाले की, मळकर्णे पंचायतीत मला व माझ्या पत्नीला लोकांनी पंच म्हणून निवडून दिल्यानंतर आम्ही कधीच भेदभाव न करता सर्वांना समान न्याय देण्याचे काम प्रामाणिकपणे करून दाखविले आहे. येत्या पंचायत निवडणुकीतही लोकांच्या आशीर्वादाने पुढे पाऊल टाकणार, असे त्यांनी सांगितले. मंत्री फळदेसाई यांचे सहकार्य आम्हाला पावलोपावली लाभले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
2012 च्या निवडणुकीच्या वेळी फळदेसाई हे आमदार असताना मळकर्णेचे मैदान उभारण्यात त्यांचा बहुमोल वाटा होता. 2017 च्या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर पाच वर्षे हे मैदान उद्घाटन न होता तसेच पडून राहिले. पण शेवटी देवाला जे पाहिजे तेच होते. आज पुन्हा एकदा फळदेसाई आमदार तसेच मंत्री झाले असून त्यांनी राबविलेल्या कामांचे श्रेय त्यांना सदर कामांच्या उद्घाटनातून मिळाले आहे. यापुढेही त्यांच्या सहकार्यातून अनेक विकासकामे मळकर्णे पंचायत क्षेत्रात होतील, असा विश्वास गावकर यांनी यावेळी व्यक्त केला.