पिण्याच्या पाण्याची समस्या मिटणार
बेळगाव : कॅन्टोन्मेंट क्वार्टर्स येथील विहिरीवर जलशुद्धीकरण प्रकल्प बसवून याचे पाणी नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन मंगळवारी राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांच्या हस्ते करण्यात आले. यामुळे आसपासच्या नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करता येणार आहे. यावर्षी एप्रिल-मे महिन्यात पाणी टंचाईची समस्या बेळगावकरांना भेडसावत होती. कॅन्टोन्मेंटने जुन्या विहिरींचे पुनरुज्जीवन करून ते पाणी वापरात आणले. ओल्ड पोस्ट ऑफिस कॅन्टोन्मेंट ऑफिस येथे मागील दोन महिन्यांपासून विहिरीशेजारी जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचे काम सुरू होते. एकूण 6 लाख 50 हजार रुपये खर्च करून जलशुद्धीकरण प्रकल्प उभा करण्यात आला. यामुळे कॅन्टोन्मेंटच्या वॉर्ड क्र. 7 मधील नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा केला जाणार आहे. मंगळवारी सकाळी राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, कॅन्टोन्मेंटचे अध्यक्ष बिग्रेडियर जॉयदीप मुखर्जी, सीईओ राजीवकुमार, कॅन्टोन्मेंट सदस्य सुधीर तुपेकर, कॅन्टोन्मेंटचे इंजिनिअर सतीश मण्णूरकर यांसह कॅन्टोन्मेंटचे कर्मचारी उपस्थित होते.