मुंबई : पुढील महिन्यात भारत अ संघ बांगलादेशच्या दौऱयावर जाणार असून या दौऱयात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळविली जाणार आहे. या दौऱयासाठी भारत अ संघाची घोषणा करण्यात आली असून त्यामध्ये चेतेश्वर पुजारा आणि उमेश यादव यांचा समावेश करण्यात आला आहे. बंगालचा सलामीचा फलंदाज अभिमन्यू ईश्वरन भारत अ संघाचे नेतृत्व करणार आहे.
बांगलादेशच्या दौऱयामध्ये हे कसोटी सामने प्रत्येकी चार दिवसांचे राहतील. या दौऱयातील पहिली कसोटी 29 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर तर दुसरी कसोटी 6 ते 9 डिसेंबर दरम्यान होणार आहे. भारत अ संघामध्ये केरळच्या रोहन कुनुमलला पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे. यशस्वी जयस्वाल आणि यश धूल हे या संघातील प्रमुख फलंदाज आहेत. बडोद्याचा अष्टपैलू अतित सेठ तसेच तिलक वर्मा यांचाही समावेश करण्यात आला आहे.