वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मध्यमवर्गियांना सुखावणारा आणि भविष्यकालीन भारताचे चित्र रंगविणारा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला आहे. सात लाख रुपयांचे उत्पन्न पूर्णपणे करमुक्त करण्याचा प्रस्ताव त्यात असून हे या अर्थसंकल्पाचे सर्वात सुखावह वेशिष्टय़ मानले जात आहे. महिला, युवावर्ग, विद्यार्थी, शेतकरी, कामगार अशा सर्व समाजघटकांच्या हितासाठी तरतुदी असणारा अर्थसंकल्प अशी त्यासंबंधीची प्राथमिक प्रतिक्रिया व्यक्त झाली आहे. व्यक्तीगत प्राप्तीकरासाठी दोन पर्याय आहेत. ज्यांना स्टँडर्ड डिडक्शन नको आहे त्यांना दुसऱया पर्यायातून सात लाख रुपयांचे उत्पन्न पूर्ण करमुक्त आहे. मात्र स्टँडर्ड डिडक्शन घेतल्यास त्यांच्यासाठीही 3 लाखांपर्यंत चे उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे. गेल्यावेळी ही मर्यादा 2.5 लाख रुपयांची होती.
उद्योग किंवा व्यवसाय करणे अधिकाधिक सुलभ व्हावे, यासाठी अनेक तरतुदी यात करण्यात आल्या आहेत. विशेषतः कंप्लायन्ससंबंधीच्या अडचणी दूर करण्यासाठी उपायांचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि कृत्रिम बुद्धीमत्ता अशा अत्युच्च तंत्रज्ञानाधारित उद्योगांना भारतात चालना मिळावी यासाठी नव्या धोरणांची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली असून, शेतकऱयांची उत्पन्नवाढ, कृषीक्षेत्राचा सर्वांगिण विकास, बहुपिक व्यवस्थापन, डाळी आणि तेलबियांच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी विशेष योजना आहेत. निर्यात वाढ आणि आत्मनिर्भरतेच्या दिशेने पुढची पावले यात टाकण्यात आली आहे.
राजकारण आणि अर्थकारणही…
2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीचा हा शेवटचा संपूर्ण अर्थसंकल्प आहे. त्यामुळे त्यात राजकारण आणि अर्थकारण यांचा समतोल साधण्याची कसरत अर्थमंत्र्यांनी यशस्वीरित्या केली आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. विविध समाजघटकांसाठीच्या तरतुदींमध्ये भरीव वाढ करण्यात आली असून, लोप पावत चाललेल्या सहकार क्षेत्राला उभारी देण्यासाठी अनेक योजनांचा प्रस्ताव आहे. वैद्यकीय शिक्षण आणि नर्सिंग महाविद्यायांची संख्या वाढविली जाणार आहे. रोजगारनिर्मितीसाठी सरकारी खर्चात वाढ केली असून पायाभूत सुविधा विकासाच्या माध्यमातून महामार्ग, खेडय़ांना शहरांशी जोडणारे रस्ते, विमानतळ, बंदरे, आधुनिक रेल्वेस्थानके, जलमार्ग आणि दूरसंचार यांच्या संवर्धनासाठी विविध तरतुदी केल्या आहेत.
सोन्या-चांदीचे दागिने महागणार
सोन्या-चांदीचे दागिने महागणार असून चांदीवरील (सोन्याने किंवा प्लॅटिनमने मढवलेल्या चांदीसह) शुल्क वाढविण्यात आले आहे. अर्ध-उत्पादित किंवा पावडरसह सर्व स्वरुपातील चांदीवरील शुल्क 7.5 टक्के ते 10 टक्के वाढविण्यात आले. सोने, चांदी आणि प्लॅटिनम या मौल्यवान धातूंपासून बनविलेल्या वस्तूंवरील शुल्कही 20 ते 25 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले आहे. ‘या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला सोने आणि प्लॅटिनमच्या डोर आणि बारवरील जकात शुल्क वाढविण्यात आले होते. आता शुल्कातील फरक मिटविण्यासाठी त्यापासून बनवलेल्या वस्तूंवरील शुल्क वाढवण्यात येत आहे, असे अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगितले.
व्यथा कनिष्ठ मध्यमवर्गीयांच्या!
बजेट! बजेट!! बजेट…!!! कित्ती आ वासून होतो आम्ही कनिष्ठ मध्यमवर्गीय जनता! कोरोनानंतर अतिशय नुकसानीत पोहोचलेलो आम्ही…, काहीतरी आमच्या समाधानाची बाब ऐकावयास मिळेल म्हणून लक्ष देऊन होतो 1 फेब्रुवारीच्या अर्थसंकल्पाकडे…! पण फक्त बोलाचीच कढी अन् बोलाचाच भात! अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केवळ कनिष्ठ मध्यमवर्गीयांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार केला.
एक वर्षभर धान्य मोफत! ही योजना आहे चांगली. पण कुणासाठी? बीपीएल कार्डधारकांसाठी! एपीएल कार्डधारकांसाठी रेशनवर काहीच धान्य मिळत नाही. हे कार्ड म्हणजे असून अडचण नसून खोळंबा. आम्ही कनिष्ठ मध्यमवर्गीयांनी पैसे मोजूनच दिवसाची रोजी रोटी चालवायची.
म्हणे, महिलांसाठी महिला सन्मान बचत योजना… दोन लाख रुपयांची, दोन वर्षासाठी साडेसात टक्क्यांनी गुंतवणूक करण्याची ही योजना. कनिष्ठ मध्यमवर्गीय महिला दोन लाख कुठून आणणार गुंतवणुकीसाठी? दुसरं काय तर म्हणे सोनं महागलं. अगोदरच सोन्याची झळाळी वाढतच चालली आहे आणि आता पुन्हा त्यात वाढ! मुलामुलींची लग्नं कशी करायची कनिष्ठ मध्यमवर्गीयांनी?
इन्कमटॅक्सची मर्यादा 5 वरून 7 लाखापर्यंत वाढवली. हे ऐकून मंत्री-खासदारांनी संसदेच्या सभागृहात बाके वाजवून अभिनंदन केले. पण ही मर्यादा कोणासाठी? इनकम टॅक्स भरणाऱयांसाठी. कनिष्ठ मध्यमवर्गीयांसाठी काय केले या बजेटमध्ये?
शेअरबाजार
अप…डाऊन…अप
अर्थसंकल्प संसदेत सादर होत असताना शेअरबाजाराची प्रतिक्रिया सकारात्मक होती. प्रथम तो जवळपास 1,200 अंकांनी वधारला होता. पण दुपारनंतर मात्र काही गुंतवणूकदारांनी नफा कमाई केल्याने त्यात मोठी घसरण दिसून आली. दुपारच्या सत्रात तो साधारणतः 300 अंकांनी घसरला होता. मात्र या घसरणीला कारण अर्थसंकल्पातील तरतुदी हे नसून नफाकमाई किंवा प्रॉफिट बुकिंग हे होते, अशी प्रतिक्रिया अनेक तज्ञांनी व्यक्त केली आहे. दुपारनंतर मुंबई शेअरबाजार आणि राष्ट्रीय शेअरबाजार यांनी पुन्हा काही प्रमाणात उसळी घेतली. दिवसअखेर मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक 154 अंकांनी वधारलेला दिसून आला.