हरिप्रिया एक्स्प्रेस 11 फेब्रुवारीपर्यंत धावणार बेळगावपर्यंतच
बेळगाव : तिरुपती-कोल्हापूर एक्स्प्रेस रेल्वेमार्गाच्या दुरुस्तीमुळे बेळगावपर्यंतच धावत आहे. यामुळे मिरज, सांगली, कोल्हापूर येथील प्रवाशांना बेळगावमध्ये उतरून पुढे बस तसेच खासगी वाहनाने पुढचा प्रवास करावा लागत आहे. यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत असून, अचानक करण्यात आलेल्या या बदलामुळे नाराजीही व्यक्त होत आहे. मिरज ते लोंढा या रेल्वेमार्गावरील सुलधाळ ते गोकाक दरम्यान दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे दि. 4 ते 11 फेब्रुवारी दरम्यान तिरुपती-कोल्हापूर हरिप्रिया एक्स्प्रेस बेळगावपर्यंतच धावणार आहे. बेळगाव ते कोल्हापूर दरम्यान रेल्वे रद्द करण्यात आल्याने प्रवाशांना बेळगावमध्ये उतरावे लागत आहे. दररोज शेकडो प्रवासी या एक्स्प्रेसने प्रवास करत असल्यामुळे अजून काही दिवस प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
खासगी वाहनचालकांकडून लूट
प्रवासी बेळगाव रेल्वेस्थानकावर उतरल्यानंतर कोल्हापूर, मिरज, सांगलीच्या दिशेने जाण्यासाठी रिक्षा व इतर वाहनांची वाट पहात आहेत. याचाच फायदा उचलत काही खासगी वाहनचालक अव्वाच्या सव्वा दर लावत मध्यवर्ती बसस्थानकापर्यंत त्यांना सोडत आहेत. तसेच काही मिनी बसेस थेट कोल्हापूरपर्यंत सोडण्यात आल्या आहेत. कारवार बसस्थानक परिसरात या मिनी बसेस लावण्यात आल्या असून, त्यातून प्रवाशांना कोल्हापूरपर्यंत घेऊन जाण्यात येत आहेत.
प्रवाशांमधून बसची मागणी
आता 11 फेब्रुवारीपर्यंत दररोज हरिप्रिया एक्स्प्रेस बेळगावपर्यंतच धावणार असल्याने प्रवाशांची गैरसोय होणार आहे. याचा फायदा खासगी वाहनचालकांना होत असून, लूट करण्याचा प्रयत्नही होत आहे. त्यामुळे हरिप्रिया एक्स्प्रेसच्या वेळेत बेळगाव ते कोल्हापूर, बेळगाव ते सांगली या मार्गावर थेट बससेवा सुरू केल्यास प्रवाशांची सोय होणार आहे. तसेच परिवहन मंडळाला महसूलही मिळणार आहे.