रस्ता त्वरित सुरू करण्याची मागणी : अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा : तहसीलदारांना कुप्पटगिरी ग्रामस्थांचे निवेदन
प्रतिनिधी /खानापूर
कुप्पटगिरी येथील गावकऱयांसाठी पूर्वापार सोडण्यात आलेला पाणंद रस्ता अचानकपणे त्या ठिकाणी जेसीबीने चर मारुन गावकऱयांसाठी येणे-जाणे बंद केले आहे. याबाबत हा रस्ता सुरू करण्यासंदर्भात कुप्पटगिरी वासियांनी तहसीलदार प्रवीण जैन यांना निवेदन देऊन रस्ता सुरू करण्याची मागणी केली
आहे.
कुप्पटगिरी गावासाठी पूर्वापार असलेला पाणंद रस्ता गावकऱयांसाठी उपयोगाचा आहे. हा रस्ता ब्रिटिशकालीन आहे. हा रस्ता नकाशात नमूद आहे. याचा वापर कुप्पटगिरीवासीय गेली अनेकवर्षे गावची गुरे पाण्यासाठी तलावाकडे घेऊन जाण्यासाठी करतात. तसेच विद्यार्थी याच रस्त्यावरून शिक्षणासाठी जातात. शेतकरी वर्गही याच रस्त्याचा वापर करत आला आहे. सर्व्हे नं. 15/8 चे मालक संजय पाटील व राजाराम पाटील यांनी ही जमीन अनिल कब्बूर यांना विकली आहे. कब्बूर यांनी हा रस्ता अचानकपणे चर मारुन बंद केल्याने गावकऱयांची व विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. यासाठी गावकऱयांनी बैठक घेऊन याबाबत आवाज उठविण्याचे ठरविण्यात आले. शुक्रवारी तहसीलदार प्रवीण जैन यांची भेट घेऊन कागदपत्रांसह निवेदन देऊन हा रस्ता पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. तसेच पोलीस खात्यालाही निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी चांगुणा पाटील, भाऊराव पाटील, गोपिका मुतगेकर, पद्दश्री पाटील, गौरी मादार, अध्यक्ष तालुका विकास आघाडी भरमाणी पाटील, रवळू पाटील, मल्लाप्पा पाटील, विठ्ठल पाटील, सुभाष पाटील, पुंडलिक तोलगेकर, सातेरी पाटील, अर्जुन पाटील, जोतिबा पाटील, एम. पी. पाटील, संभाजी पाटील, भाऊ पाटील, सूर्याजी पाटील यांच्या निवेदनावर सहय़ा आहेत.
वाद सामोपचाराने मिटवावा
यावेळी पंचकमिटीचे सदस्य ‘तरुण भारत’शी बोलताना म्हणाले, हा रस्ता पूर्वापार आहे. जर हा रस्ता पुन्हा सुरू केला नसल्यास याबाबत संपूर्ण गावकरी, पंचकमिटी व पंचायत सदस्य यांनी एकत्र येऊन उग्र आंदोलन करण्यास आम्ही तयार आहोत. अद्याप वेळ गेलेली नाही. पाटील व कब्बूर यांनी हा प्रश्न सामोपचाराने मिटवावा, अशी आमची मागणी आहे.