राजेंद्र प्रसाद चौकमधील प्रकार, अपघाताच्या घटना :त्वरित दुरुस्त करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी विविध चौकात ट्राफिक सिग्नल सुविधा करण्यात आली आहे. मात्र बहुतांश चौकातील सिग्नल सुविधा खराब झाली असल्याने वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. राजेंद प्रसाद चौकमधील सिग्नल व्यवस्था कोलमडल्याने वाहनधारकांमध्ये गेंधळ निर्माण होऊन अपघात घडत आहेत.
शहरातील प्रमुख रस्त्यांवर धावणाऱया वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी रहदारी खात्याच्यावतीने विविध चौकात ट्राफिक सिग्नल बसविण्यात आले आहेत. गोगटे सर्कल, राणी चन्नम्मा चौक, मध्यवर्ती बसस्थानक, कोल्हापूर क्रॉस आदी ठिकाणांचे ट्राफिक सिग्नल सुरू आहेत. मात्र राजेंद्र प्रसाद चौकमधील ट्राफिक सिग्नल खराब झाला असून याचा फटका वाहनधारकांना बसत आहे. सिग्नल सुरू असतानाच लाल रंगाचा दिवा व्यवस्थित लागत नसल्याने वाहनधारकांमध्ये गैरसमज निर्माण होत आहे. युनियन जिमखान्याकडे जाणाऱया रस्त्यावरील लाल दिवा सुरू नसल्याने वाहनधारक थांबण्याऐवजी जात आहेत. तर हिरवा दिवा बंद असल्याने सिग्नल सुटल्याची माहिती वाहनधारकांना कळत नसल्याने वाहनधारक थांबून रहात आहेत. यामुळे वाहनधारकांना धोकादायक बनले असून काहीवेळा छोटेमोठे अपघात घडत असल्याची टीका नागरिक करीत आहेत. चौकमधील सिग्नलचा वेळ दर्शविणारे घडय़ाळ बंद असल्याने वाहनधारकांना गैरसोयीचे होत आहे.
राजेद्र प्रसाद चौकातील सिग्नल वारंवार नादुरूस्त होत असून दुरूस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आले असल्याने महिन्यापासून येथील वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. याचा फटका नागरिकांना बसत असल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत असून सिग्नल व्यवस्था दुरुस्त करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
महापालिका-स्मार्ट सिटीने दुरुस्तीची जबाबदारी झटकली
सिग्नल दुरुस्तीसाठी रहदारी पोलिसांनी स्मार्टसिटी कंपनीकडे तसेच महापालिकेकडे तक्रार केली होती. पण स्मार्टसिटीने सिग्नलची दुरूस्ती करण्यास नकार दिला आहे. स्मार्टसिटी योजनेअतंर्गत ट्राफिक सिग्नल बसविण्यात आली होती. पण दुरूस्तीची जबाबदारी आपली नसल्याचे सांगून अधिकारी टोलवाटोलवी करीत आहेत. महापालिकेनेदेखील जबाबदारी झटकली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.