ग्रा.पं.-ग्रामस्थांच्यावतीने राज्य परिवहन मंडळ अधिकाऱयांना निवेदन
वार्ताहर /सांबरा
पंत बाळेकुंद्रीला असलेली दुसरी बसफेरी मागील वर्षापासून रद्द केली आहे. त्यामुळे बससेवेचे वेळापत्रक कोलमडले असून विद्यार्थी व नागरिकांची गैरसोय होत आहे. सदर बससेवा पूर्ववत सुरू करून गैरसोय दूर करावी, या मागणीचे निवेदन ग्रा.पं. व ग्रामस्थांच्यावतीने मंगळवारी राज्य परिवहन मंडळाच्या अधिकाऱयांना दिले. बससेवा पूर्ववत सुरू न केल्यास रास्ता रोको आंदोलनाचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला.
पूर्वी पंत बाळेकुंद्रीला दोन बसफेऱया होत्या. त्यामुळे नागरिक व विद्यार्थ्यांना सोयीचे होत होते. याचा लाभ बाळेकुंद्री खुर्द, सांबरा, मुतगा व निलजी येथील विद्यार्थी -नागरिकांनाही होत होता. मात्र, कोरोना काळात शाळा-महाविद्यालये बंद झाल्यानंतर राज्य परिवहन मंडळाने दुसरी बसफेरी रद्द केली.
वास्तविक पुन्हा शाळा- महाविद्यालये सुरू झाल्यानंतर दुसरी बसफेरी सुरू करण्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. राज्य परिवहन मंडळाने दुसरी बसफेरीही तातडीने सुरू करून सकाळी साडेनऊ व सायंकाळी साडेपाच या वेळात बसफेऱया वाढवाव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. परिवहन मंडळाच्या अधिकाऱयांनी तातडीने बसफेरी सुरू करण्याचे आश्वासन दिले. निवेदन देताना ग्रा. पं. अध्यक्षा अबेदा बेगम सनदी, उपाध्यक्षा भाग्यश्री हणबर, रवी पाटीलसह विजय जाधव, यश देसुरकर, दौलत पाटील आदी उपस्थित होते.