प्रवाशांची गैरसोय, विद्यार्थ्यांची परिवहनकडे निवेदनाद्वारे मागणी
► प्रतिनिधी/ बेळगाव
बेळवट्टी परिसरातील प्रवाशांना आणि विद्यार्थ्यांना अनियमित बससेवेचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनावर परिणाम होत आहे. त्यामुळे बेळवट्टी, बडस आणि बाकनूर भागातील बससेवा सुरळीत करण्यासाठी बसफेऱ्या वाढवाव्यात, अशी मागणी बेळवट्टी ग्राम पंचायततर्फे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन विभागीय नियंत्रक अधिकारी पी. वाय. नायक यांच्याकडे देण्यात आले.
बेळवट्टी, बडस, बाकनूर, बेटगिरी, धामणे आदी परिसरातून बेळगावला येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. मात्र त्या तुलनेत केवळ दोन बस उपलब्ध आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. वेळेत बस मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना तासन तास ताटकळत थांबावे लागत आहे. विशेषत: सायंकाळी घरी परतणाऱ्या विद्यार्थ्यांना बस मिळत नसल्याने खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे बसपास असून देखील आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. विशेषत: विद्यार्थ्यांना घरी पोहोचायला रात्री उशीर होत आहे. त्यामुळे यामध्ये विद्यार्थिनींची कुचंबणा होत आहे. शिवाय सुरक्षिततेचा प्रश्न देखील निर्माण होत आहे. त्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. तातडीने या मार्गावर बसफेऱ्या वाढवाव्यात, अशी मागणी होत आहे. यावेळी बेळवट्टी ग्रामपंचायत अध्यक्ष म्हाळू मजुकर, सदस्य विठ्ठल पाटील, बाबुराव पाटील, मधू नलवडे, रेश्मा कुलम, रेणुका सुतार, रुपा सुतार, अनुराधा कांबळे, महादेवी मादार यासह विद्यार्थी उपस्थित होते.