विद्यार्थ्यांचे नुकसान, ग्राम पंचायतीची परिवहनकडे मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
उचगाव येथील विद्यार्थ्यांचे अनियमित आणि अपुऱया बससेवेमुळे शैक्षणिक नुकसान होत आहे. प्रवाशांच्या तुलनेत बसफेऱया कमी असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. विशेषतः विद्यार्थी वर्गाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी तात्काळ जादा फेऱया सुरू कराव्यात, अशा मागणीचे निवेदन उचगाव ग्राम पंचायतीतर्फे परिवहन मंडळाचे विभागीय नियंत्रक अधिकारी पी. वाय. नाईक यांना देण्यात आले.
उचगाव येथून बेळगावला शिक्षणासाठी दररोज शेकडोहून अधिक विद्यार्थी ये-जा करीत असतात. मात्र बसफेऱया कमी असल्याने विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सकाळच्या फेऱया अनियमित असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत परिवहनकडे तक्रार देवून देखील अद्याप नियमित बससेवा सुरू झाली नाही. शिवाय सायंकाळच्या वेळेत देखील उचगावकडे जाणारी बस वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांना तासन्तास ताटकळत थांबावे लागत आहे. तर काही विद्यार्थ्यांना बसपास असून देखील खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे आर्थिक फटकाही सहन करावा लागत आहे.
अपुऱया बससेवेमुळे विद्यार्थ्यांचा लोंबकळत प्रवास
अपुऱया बससेवेमुळे विद्यार्थ्यांना दरवाजात लोंबकळत धोकादायक प्रवास करावा लागत आहे. बसफेऱया वाढविण्यासाठी अनेकवेळा तक्रारी देवून देखील परिवहनचे याकडे साफ दुर्लक्ष झाले आहे. येत्या काळात उचगावाला बसफेऱया न वाढविल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा देखील विद्यार्थ्यांनी दिला आहे. यावेळी पी. वाय. नाईक यांनी सर्वे करून नियमित बससेवा सोडण्याचे आश्वासन दिले. यावेळी ग्राम पंचायत अध्यक्ष जावेद जमादार, उपाध्यक्षा मथुरा तेरसे, सदस्य एल. डी. चौगुले, बंटी पावशे, बाळकृष्ण तेरसे, भारती जाधव, गजानन नाईक, यादव कांबळे आदींनी निवेदन सादर केले.