शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक : पालक-विद्यार्थी रांगेत
प्रतिनिधी /बेळगाव
शाळा, महाविद्यालये सुरू झाल्याने शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी जात उत्पन्न दाखल्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे जनस्नेही केंद्रांवर विद्यार्थी आणि पालकांची गर्दी वाढू लागली आहे. शाळा-महाविद्यालयात प्रवेशासाठी जात उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थी दाखला मिळविण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत.
दहावी, बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश घेण्यासाठी धडपड सुरू झाली आहे. दरम्यान, विविध शासकीय कागदपत्रे जमा करण्यासाठी विद्यार्थी धडपड करत आहेत. शैक्षणिक प्रवेश, शिष्यवृत्ती आणि इतर सवलतींचा लाभ घेण्यासाठी जात आणि उत्पन्नाचा दाखला गरजेचा आहे. त्यामुळे जात उत्पन्न दाखल्याची मागणी वाढली आहे.
विद्यार्थ्यांना कार्यालयांचे हेलपाटे
जुन्या तहसीलदार कार्यालयासह काकती, सांबरा, उचगाव आदी ठिकाणी असलेल्या जनस्नेही केंद्रांत पालक आणि विद्यार्थ्यांची वर्दळ वाढली आहे. दरम्यान, काही ठिकाणी जनस्नेही केंद्रे तांत्रिक अडचणींमुळे बंद ठेवली जात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना हेलपाटे मारावे लागत आहेत.
दोन वर्षांच्या कालावधीनंतर यंदा शैक्षणिक वर्षाला सुरळीत प्रारंभ झाला. शिवाय नुकताच बारावीचा निकालही जाहीर झाला आहे. त्यामुळे पुढील प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या जात उत्पन्न दाखल्याची मागणी वाढली आहे. जात उत्पन्न दाखला मिळविण्यासाठी रेशनकार्ड, आधारकार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, दोन फोटो आवश्यक आहेत.
याबरोबर अर्ज दाखल केल्यानंतर काही दिवसांच्या कालावधीनंतर विद्यार्थ्यांना जात उत्पन्नाचा दाखला मिळणार आहे. मागील दोन वर्षात कोरोनामुळे शैक्षणिक वर्ष विस्कळीत झाले होते. त्यामुळे जात उत्पन्न दाखल्याची मागणी थंडावली होती. मात्र, यंदा पुन्हा शैक्षणिक वर्षाला सुरळीत सुरुवात झाल्याने जात उत्पन्न दाखल्याच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे जनस्नेही केंद्रांसमोर पालक आणि विद्यार्थ्यांच्या रांगा लागत आहेत.