प्रतिनिधी/ बेळगाव
परतीच्या पावसाचा फटका बसल्याने भाजीपाला दरात भरमसाट वाढ झाली आहे. सर्वच भाजीपाल्याचे दर वाढल्याने सर्वसामान्यांना संकटांना तोंड द्यावे लागत आहे. आधीच वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य कचाटय़ात सापडले आहेत. त्यातच भाजीपाला दराने सर्वसामान्यांची झोप उडाली आहे. मागील काही दिवसांपासून भाजीपाल्याचे वाढलेले दर अद्याप स्थिर आहेत. कडधान्य आणि डाळींचे दरदेखील वाढले आहेत. शिवाय दिवाळीच्या तोंडावर खाद्यतेलाच्या किमतीही वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांसमोर काय खावे? हाच प्रश्न पडला आहे.
शनिवारच्या बाजारात कोबी 10 ते 20 रुपये एक, फ्लॉवर 30 रु. एक, बटाटा 30 रु. किलो, ढबू 60 रु., गवार 60 रु., बिन्स 60 रु., वांगी 60 रु., ओली मिरची 80 रु., भेंडी 60 रु., टोमॅटो 50 रु., दोडकी 50 रु., कारली 50 रु., शेवग्याच्या शेंगा 20 रु. किलो, कोथिंबीर 5 रु. एक पेंडी, शेपू 10 रु. एक पेंडी, कांदापात 20 रु. चार पेंडय़ा, लाल भाजी 10 रु. दोन पेंडय़ा, मेथी 20 रु. एक पेंडी, कांदे 30 रु. किलो असा दर आहे.
सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये पहिल्या पंधरवडय़ात झालेल्या पावसाने भाजीपाला पिकावर मोठा परिणाम झाला आहे. भाजीपाला कुजल्याने आवक मंदावली आहे. त्यामुळे भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली आहे. नवीन भाजीपाला जोपर्यंत उत्पादित होणार नाही, तोपर्यंत भाज्यांचा दर कमी होणार नाहीत, असा अंदाज वर्तविला जात आहे. मागील काही दिवसांपासून भाज्यांचे दर कडाडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. काहीजण वाढत्या भाजीपाला दरामुळे अंडय़ांना पसंती देऊ लागले आहेत.
किरकोळ बाजारात भाजीपाल्याची मागणी वाढली असली तरी नागरिकांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत. सर्वसामान्यांना भाजीपाल्याचे दर कमी होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात भाजीपाल्याचे दर अद्याप कमी झाले नाहीत. त्यामुळे चढय़ा दरानेच भाजीपाला खरेदी करावा लागत आहे.